नाशिक : कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर ग्रामीण भागासह शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार शहरातील २२७, तर ग्रामीण भागातील २ हजार ८०२ अशा जिल्ह्यातील ३ हजार २९ शाळा सोमवार (दि. ४) पासून सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी जय्यत तयारी केली आहे.
कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर गेल्या महिन्यापासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होत आहेत. ग्रामीण भागात ३ लाख ६ हजार ९१४ विद्यार्थी शिक्षण घेतात. तर, शहरात १ लाख १० हजार विद्यार्थी आहेत. प्रत्येक दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहावे लागेल. तसेच, विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे इंग़्रजी, गणित व विज्ञान हे विषय शाळेत प्राधान्याने शिकवले जाणार आहेत. त्यादृष्टीने शाळांनी संपूर्ण तयारी केली आहे.