नाशिक । त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महादरवाजा मेट येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी 35 फुट खोल विहिरीत उतरुन जीवघेणी कसरत करावी लागत आहे. हाताला लागलेले पाणी कितीही वेळा गाळले तरी त्याचा रंग मातीसारखाच असल्याने येथील ग्रामस्थांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नळ पाणी योजनेचे उद्घाटन केलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हा पाडा, मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारा महादरवाजा मेट, पाचशे लोकवस्तीच्या गावासाठी ना रस्ता आहे ना पाण्यासाठी सोय. पाण्यासाठी यांची भिस्त अडीच किलो मिटरच्या या विहिरीवर. त्यात विहिरीचे पाणीही तळाला गेले. त्यामुळे रात्रभर विहिरीच्या कडेला थांबून वाट पाहायची आणि पाणी जमल्यावर अशा प्रकारे कसरत करीत एकीने विहिरीत उतरावे, अशी जीवघेणी कसरत येथील महिलांना करावी लागत आहे. विहिरीतील पाण्याची पातळी एवढी खोल गेली आहे की एखादीला खाली उतरुनच सगळ्यांची डबडी भरुन द्यावी लागतात. तेव्हा हांडाभर पाणी शेंदणे शक्य होते. एवढी कसरत केल्यावर वाट्याला येते तेदेखील चिखल भरलेले गढूळ पाणी. कितीही गाळले तरी त्याचा मतकट रंग़ सरत नाही. पुन्हा अडीच किलोमिटर पायपीट करुन हे पाणी घरी न्यायचं आणि चिखल खाली बसला की ते वापरासाठी घ्यायचं, असा आरोग्यालाही धोकादायक आहे.