शहरात विकासकामे नक्की करावीत, मात्र ती करताना नागरिकांच्या सोयीची नसतील तर त्याचा उपयोग काय, असा आरोप करत शिवशक्ती चौक येथे पावसाळी नाल्याच्या सुरू असलेल्या कामाला विरोध करत ते बंद पाडण्याचे पाऊल नागरिकांनी उचलले. या कामाची तक्रार पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
शिवशक्ती चौक येथे पावसाळी नाल्यावर तब्बल 11 कोटी रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक उभारला जात आहे. मुळात हा पावसाळा नाला असल्याने यातून फक्त पाणीच वाहून दिले जाणे अपेक्षीत आहे. कारण शहर वाढते आहे, सांडपाणी व पावसाळी पाणी वाहून जाणे गरजेचे आहे. हे पाणी साचून राहिल्यास किंवा पावसाचे पाणी वाहून न गेल्यास पुराचा संभाव्य धोका निर्माण होतो. अगोदरच पावसाळी नाले अतिक्रमण करून बुजवले जात असताना पुन्हा असे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शिवशक्ती चौकातील या नाल्यावर मोठी भिंत उभी करावी व या नाल्यातून जाणारे पाणी विनाअडथळा निघून जावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक उभारला जात आहे.
या नाल्यावर कुणी जॉगिंगसाठी येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय हे काम सुरू असताना अगोदर केलेले काम खराब करून ड्रेनेजच्या लाईन फोडल्या जात असल्याने मनपाच्या कामाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. गुरुवारी सकाळी या ठिकाणी नागरिकांनी जमा होत काम बंद पाडले. प्रभागातील नगरसेविका अलका आहिरे यांनी घटनास्थळी पाहणी करत या कामातील मनपा अधिकार्यांची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी राजेश डबे, शिरीष खैरनार, संजय मोरे, तुषार सूर्यवंशी, उखा चौधरी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
नागरिकांचा कामांना विरोध असेल तर काम तत्काळ बंद करा. आधी नागरिकांची महत्वाची मागणी आहे, ती पूर्ण करा व नंतर इतर कामे करण्याच्या सूचना आहिरे यांनी यावेळी केल्या.