नाशिक निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा धुराळा अधिक तीव्रतेने उडताना दिसत आहे. जिल्ह्यात मोठ्या सभांना प्रारंभ झाला नसला तरीही गावोगावी आणि वॉर्डावॉर्डात छोटेखानी सभांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. विविध मुलाखतींमध्येही ते एकमेकांवर आरोप करण्यास विसरत नाही. विकासाच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा यंदा प्रतिस्पर्ध्यावर आरोप करण्यातच धन्यता मानली जात आहे. नाशिक मतदारसंघातील विविध सभा, मुलाखती आणि प्रचार कार्यात एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा हा थोडक्यात धांडोळा…
भुजबळांच्या भ्रष्ट कारभाराचे नाशिककर साक्षीदार
भुजबळ कुटूंबियांच्या भ्रष्ट कारभाराची प्रचिती समस्त नाशिककरांनी घेतली आहे. नाशिकच नव्हे तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ते याच गोष्टीपोटी बदनाम आहे. उड्डाणपुलाला आपल्या निवासस्थानाजवळ उतरविणारे भुजबळ सर्वसामान्यांचे कसे होणार. नाशिकची जणता सुजान आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तरुंगवास भोगलेले आणि जामिनावर बाहेर आलेल्यांना जनता मतदान तरी कशी करणार. मी केलेला विकास दृश्य स्वरुपाचा आहे. भुजबळ कुटूंबियांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय योगदान दिले? – हेमंत गोडसे, विद्यमान खासदार तथा उमेदवार, शिवसेना
गोडसे केवळ पोस्टरबॉय
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे केवळ पोस्टर बॉय असून पत्रकाबाजी करणे आणि निवेदन देणे आणि माध्यमांमधून फोटो छापून आणणे या व्यतिरिक्त नाशिकचा काहीही विकास करु शकलेले नाही. ज्याला आपले विचार स्वतंत्रपणे मांडता येत नाही तो संसदेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व कसे करणार? देशात विकासात १६ व्या स्थानी असलेने नाशिक शहर आज या यादीतूनच गायब झाले. आघाडी सरकारच्या कार्यकाळात नाशिकला मंत्रीमंडळाची बैठक घेउन विशेष पॅकेज देऊ केले. मात्र दत्तक नाशिकसाठी मुख्यमंत्री एकही प्रकल्प आणू शकले नाहीत उलट नाशिककरांना करवाढीची भेट दिली. परंतु सुज्ञ नाशिककर निश्चितपणे विकासाच्या बाजूने साथ देतील. – छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री
युती शासन नाशिकच्या विकासातला ‘स्पीड ब्रेकर’
एप्रिल फूल करण्यात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जितके तरबेज आहेत, तितकेच तरबेज नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे आहेत. विकास कामे करता आली नाही म्हणून दररोज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नावाने शिमगा साजरा करुन लोकांना मूर्खात काढत आहे. नजरेत भरणारे एकही विकास काम त्यांच्याकडे नाही, आघाडी सरकारच्या सन २००९ ते २०१४ या कार्यकाळात नाशिकमध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प आले. मात्र गेल्या पाच वर्षात कुठलीही नवीन योजना प्रकल्प ते आणू शकले नाहीत. त्यामुळे भाजप शिवसेना युती नाशिकच्या विकासातील स्पीड ब्रेकर ठरले आहे. – समीर भुजबळ, माजी खासदार
विकासाच्या नावाने फसवणूक
विकासाच्या नावाने नाशिककरांची युतीच्या खासदारकडून फसवणूकच झाली आहे. नाशिकमध्ये एक तरी मोठा प्रकल्प आणल्याचे त्यांनी दाखवुन द्यावे. आता जे काही प्रकल्पांचे भूमिपुजनाचा दिखावा केला गेला ते प्रकल्प भुजबळ यांच्या कार्यकाळातच मंजूर केले गेले आहेत. मात्र केवळ आघाडीला विकासाचे श्रेय मिळू नये म्हणून या प्रकल्पांकडे दुर्लक्ष करून नाशिककरांची शुध्द फसवणुक करण्यात आली मात्र यंदा नाशिककर त्यांना धडा शिकवतील. – डॉ. शोभा बच्छाव, माजी मंत्री
भुजबळांमुळे माझी खासदारकी गेली
छगन भुजबळ यांनी आपल्याविरुध्द केलेल्या खोट्या प्रकरणांमुळेच खासदार होऊ शकलो नाही. असं म्हणतात की भगवान के घर में देर है, अंधेर नहीं. तसेच भुजबळांचे झाले. मला तुरुंगात जाण्यास भाग पाडणार्या भुजबळांनाच तुरुंगातील खडे फोडावे लागले. अशा भ्रष्टाचार्यांना आता मतदारच धडा शिकवतील. – बबन घोलप, माजी मंत्री, शिवसेना
जातीय विष पेरणार्यांना धक्का देणार
जातीचे विषारी राजकारण पेरत युती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने मतदारसंघात दलित, मुस्लिम आणि बहुजनांना विकासापासून दूर ठेवले आहे. या मतदार संघासाठी भुजबळांसह गोडसेंनाही काही करता आलेले नाही. केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ते संसदेत जाण्याच्या तयारीत असतात. जनता वेडी नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांना मानणारे मतदार आता प्रस्थापीतांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. – पवन पवार, जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार, वंचित बहुजन आघाडी
भुजबळ, गोडसेंना जागा दाखवणार
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा येतो. त्यामागे गुन्हेगारी वाढते. ही साखळी आहे. छगन भुजबळ यांच्या राजकारणात जातीयतेचा वास आहे. मीच ओबीसींचा नेता आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांचा फाजील आत्मविश्वास यापुढे चालणार नाही. भुजबळांमुळे नाशिकमध्ये एकतरी उद्योग उभा राहिला का? तशीच परिस्थिती हेमंत गोडसेंची आहे. त्यांनी आजवर कोणता मोठा प्रकल्प नाशकात आणला? मुखदुर्बल असलेल्या या खासदाराने लोकसभेत किती प्रश्न विचारले? त्यामुळे या दोघांनाही मी जागा दाखवणार आहे. – माणिकराव कोकाटे, माजी आमदार तथा अपक्ष उमेदवार
भुजबळ, गोडसे, कोकाटेंना जनता कंटाळली
भुजबळ हे मराठाव्देशी असल्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवारी करत आहे. तसेच खासदार हेमंत गोडसे यांना निवडून आणण्यासाठी २०१४ मध्ये जीवाचे रान केले. तेच खासदार मराठा आरक्षणाच्या लढ्यात कोठेही दिसले नाही. त्यामुळे या दोघांना पाडण्यासाठी मी उमेदवारी करत आहे. भुजबळ, गोडसे किंवा माणिकराव कोकाटे यांना मतदार आता कंटाळले असून, त्यांच्या भूलथापांना लोक यंदा बळी पडणार नाहीत. युवकांना त्यांचे नेतृत्व करणारा उमेदवार हवा असतो. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या रिंगणात सर्वात कमी वयाचा उमेदवार म्हणून माझी क्रेझ निर्माण झाली आहे. उर्वरीत उमेदवारांचे वय आणि त्यांच्या भूलथापा यांना दूर सारुन सर्व युवक माझ्या पाठीमागे आहेत. – करण गायकर, छावा क्रांतिवीर सेना