नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मंगळवारी (दि.24) राज्यात शिवसेना व भाजपमध्ये झालेला राडा अजूनही मिटलेला नाही. शिवसेनेने राणेंविरोधात बॅनर झळकावल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. कायद्याचा धाक आम्हालाच का दाखवता? असा प्रश्न उपस्थित करत आमदार देवयानी फरांदे यांनी महाराष्ट्रात अशाच पध्दतीने गुंडगिरीचे राजकारण चालणार असेल तर आम्हालाही आत्ताच अटक करा, असे आव्हान पोलिसांना त्यांनी दिले.
शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी तुफान राडा झाला. यानंतर शिवसेनेने राणेंविरोधात ‘भोकं पडलेला फुगा!’ अशा स्वरुपाचा फलक झळकावला. यानंतर भाजपच्या पदाधिकार्यांनी पोलीस आयुक्तांची भेट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी आमदार फरांदे म्हणाल्या की, कामटवाडे परिसरात युवासेनेने मोठा मेळावा घेतला. त्यांच्यावर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. कायदा फक्त आमच्यासाठीच आहे का? या महाराष्ट्रात फक्त गुंडगिरी आणि धाक, दडपशाहीचे राज्य चालणार असेल तर आम्हाला सर्वांना आत्ता, याक्षणी अटक करा असा आग्रह धरला.
शिवसेना कार्यालयात दोन हजार कार्यकर्ते जमले होते. त्यांच्यावर पोलिसांनी काय कारवाई केली. या कार्यकर्त्यांनी गाडी फोडली हे सर्वत्र प्रसारित झाले. मग पोलीस यावेळी काय करत होते? असा प्रश्नही आमदार फरांदे यांनी उपस्थित केला. अशा कार्यकर्त्यांना मुंबईत पाठवण्यात आले आणि उलट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे त्यांचे अभिनंदन करत आहेत. हा कायद्याचा भंग नाही का? त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर पोलीस आयुक्तांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.