नाशिक : थकित कर्जामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अखेरचा घटका मोजत आहे. मिळालेल्या माहितीनूसार रिझर्व्ह बँकेकडून बँकेचा परवाना रदद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परवाना अबाधित ठेवण्यासाठी नाशिक जिल्हा बँकेला कठोर पाऊले उचलावे लागत आहे. याकरीता आता बडया थकबाकीदारांची यादी तालुकापातळीवर प्रसिध्द केली जाणार आहे.
जिल्ह्यातील शेतकर्यांची अर्थवाहिनी म्हणून जिल्हा मध्यमवर्ती बँकेकडे पाहिले जाते. आर्थिक गरज असेल तेव्हां शेतकर्यांची नजर जिल्हा बँकेवरच असते. त्यामुळे ऐनवेळी शेतकर्यांना मदत करणारी म्हणून जिल्हा बँक ओळखली जाते. परंतु, बँकेकडून मिळणार्या कर्जाची परतफेड वेळेत करण्यात येत नसल्याने बँक अडचणीत आली आहे. लहान शेतकरी भीतीने कर्जफेड करण्यात पुढाकार घेत असले तरी अनेक मोठे शेतकरी थकबाकी भरण्याकडे टाळाटाळ करीत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. जिल्हा बँकेचे ५५ हजाराहून थकबाकीदार आहेत.
बँकेच्या बड्या 67 थकबाकीदारांनी बँकेचे कर्ज न फेडल्याने कोट्यवधी रुपये अडकून पडले आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे बँकेने कर्ज वसूल करण्यासाठी 67 बड्या थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये जाहीर यादी प्रसिद्ध करून हवा तसा प्रतिसाद जिल्हा बँकेला मिळाला नाही.त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या वतीने गावागावात आता थकबाकीदारांच्या यादीचा फलक लावला जाणार आहे. याशिवाय दवंडी देखील दिली जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे जिल्हा बँकेने थकबाकीदार आहे त्यांनी कर्जपरतफेड करावी यासाठीचा हा खटाटोप आहे. त्यामध्ये आता ही नवी शक्कल कितपत प्रभावी ठरते यावर भर दिला जात आहे.
थकबाकीदारांमध्ये बडे राजकारणी
नाशिक जिल्ह्यातील अनेक बडे थकबाकीदार हे जिल्ह्यातील बडे राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांना सोडून लहान शेतकर्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट शेतकर्यांनी घेतली होती. यापूर्वी जिल्हा बँकेच्या वतीने थकबाकीदार शेतकर्यांची वसूली बँकेकडून केली जात होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी विरोध केल्यानंतर ही वसूली मोहीम थांबविण्यात आली होती. पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात आला. अनेक शेतकर्यांनी आंदोलने केली होती. त्यानंतर सहकार मंत्र्यांनी यामध्ये वसूलीला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही बँकेच्या अधिकार्यांना देण्यात आल्या होत्या. अशातच बँकेच्या वतीने केली जाणारी वसूलीच्या कारवाई बळ मिळाले होते.