जिल्ह्यातील निर्बंध शिथील झाल्यानंतर आता एसटी महामंडळाने बससेवेलाही डबलबेल दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा मिळणार असला तरी शहर बससेवा बंदच राहणार असल्याने नागरिकांना खासगी वाहनांनीच प्रवास करावा लागेल.
कोरोनाच्या निर्बंधांमुळे लॉकडाऊन झालेली ‘लालपरी’ आता रस्त्यावर उतरणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने तयारी केली असून, सोमवारी नाशिक -धुळे मार्गावर सकाळी 5 वाजेपासून दर अर्ध्या तासाने बस सुटेल. नाशिक येथून विविध जिल्ह्यात बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे मार्गावर सकाळी 5 वाजता दर अर्ध्या तासाने बस सुटेल. मुंबई, बोरिवली, मार्गावर सकाळी 6 वाजता पासून दर एक तासाने बस सुटेल. जळगाव मार्गावर ८ वाजता पासून दर तासाने बस सुटेल. पाचोरा,चोपडा, शिरपूर या मार्गावर देखील बस सेवा सुरू करण्यात आली आहे. नाशिक-नंदुरबार मार्गावर दर तासाला बस सुटेल. नाशिक औरंगाबाद मार्गावर दर तासाला बस सुटेल. त्याचप्रमाणे तालुका ते जिल्हा अशा बसेसचे देखील नियोजन केले आहे. सर्व बसेस स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. प्रत्येक प्रवाशी यांनी मास्क घालावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. बसेसमध्ये पूर्ण आसन क्षमतेने प्रवाशी वाहतूक सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत.
शहर बससेवा सुरु करण्यासाठी महापालिकेलाच पुढाकार घ्यावा लागेल, असे दिसते.
शहर बससेवा सुरु करण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील बससेवा दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु करण्यात येईल. यात पुणे, मुंबई, जळगाव, शिरपूर आदी ठिकाणी सकाळी निर्धारित वेळेत बसेस धावतील.
– राजेंद्रकुमार पाटील,विभाग नियंत्रक, नाशिक