नाशिक : राज्यातील गडकिल्यांवर तिरंगा फडकविण्याची आदर्श परंपरा जपत घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी सटाणा तालुक्यातील मुल्हेर किल्ल्यावर ७३ व्या प्रजासत्ताकदिनी तिरंगा ध्वज फडकावून ध्वजारोहण केले. गडकिल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्यासाठी घोटी येथून १५० किलोमीटर अंतरावर जाऊन हा उपक्रम राबविला.
घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक गेल्या दोन दशकांपासून दरवर्षी प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन, मराठी सण महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर साजरा करीत आहेत. त्यातून ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन होऊन इतिहास जपला जावा व गडकिल्ल्यांविषयी जनजागृती मंडळाचे गिर्यारोहक करीत आहेत. यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी घोटी येथून १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सटाणा तालुक्यातील इतिहासकालीन प्रसिद्ध मुल्हेर किल्ल्यावर जाऊन तिरंगाचे ध्वजारोहण केले.
तसेच मुल्हेर गड, मोरगडाच्या पायथ्याशी असलेल्या जाखोडवाडीच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मंडळाकडून शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे,बाळासाहेब आरोटे, काळू भोर, गजानन चव्हाण, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, सुरेश चव्हाण, गोकुळ चव्हाण, दीपक कडू, भगवान तोकडे, आदेश भगत, सोमनाथ भगत, उमेश दिवाकर, पुरुषोत्तम बोराडे, गोविंद चव्हाण, बाळासाहेब वाजे, संदीप खैरनार, जान्हवी भोर, चतुर्थी तोकडे, सृष्टी खैरनार, संतोष म्हसने, लक्ष्मण जोशी, राजू जोशी, रतन कडू, पांडुरंग भोर, रुद्र हेमके, कृष्णा बोराडे, पुष्कर पवार, व्यंकटेश भोर, गणेश बागुल, महेश बागुल आदी सहभागी झाले होते.