त्र्यंबकेश्वर तालुका १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, शासनाने मंजूर केलेले व बांधून दिलेले शौचालय प्रत्यक्षात मिळालेच नाहीत अशा लाभार्थींची नावे पुढे येत असल्याने हे अभियान केवळ कागदोपत्री यशस्वी असल्याचे बोलले जात आहे. तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांचा लाभ दुसरेच कोणी तर लाटत नाही ना, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
तालुक्यातील वेळुंजे ग्रामपंचायत अंतर्गत हेदुलीपाडा येथील मंजूर शौचालय गहाळ झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. वेळुंजे (ता. त्र्यंबकेश्वर) ग्रामपंचायत अंतर्गत हेदुलीपाडा येथे ९ शौचालये मंजूर झाली होती. परंतु एक वर्ष होऊनही ती शौचालये लाभार्थ्यांना बांधून देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे लाभार्थी यांना ही बाब संशयास्पद वाटल्याने त्यांनी नाशिक जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आहे. निवेदनावर सक्रु शिद, समाधान हागोटे, शंकर हागोटे, तुळशीराम हागोटे, बुधा हागोटे, नंदा हागोटे, त्र्यंबक हागोटे, हिराबाई हागोटे, पांडू भुरबुडे आदींच्या सह्या/अंगठे आहेत. दरम्यान या शौचालयाचे पैसे लाभार्थींना मिळालेले नाहीत. मात्र, ते पैसे परस्पर काढले गेले आहेत. त्यामुळे गरजू लाभार्थी वंचित राहिले आहेत. दरम्यान, सक्रू शिद यांच्या तक्रारीवरून त्यांच्यासाठी मंजूर पैसे परस्पर गहाळ झाल्याचे म्हटले आहे.