नाशिक शहरासह जिल्ह्यातही कोरोना संसर्ग कायम आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाकडून माझं कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनानं गाव आणि तालुका पातळीवर कोरोनामुक्तीसाठी काम सुरू केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोरोनामुक्तीसाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुंबईतल्या केईएमच्या धर्तीवर नाशिकमध्ये आधुनिक रुग्णालय सुरू करण्याला प्राधान्य द्यावं, रेमडीसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा भासू देऊ नका, औषध साठ्याची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावली जावी. तसेच, तालुकास्तरावर कोविड सेंटर, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन उपलब्धता, प्रबोधन अशा सर्वच पातळ्यांवर काम करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.