नाशिक : राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु झाली असली, तरी महाविद्यालयातीलच वसतिगृह कोरोनाचे सुपरस्प्रेड ठरत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. राज्यात १५ ते ३० जानेवारी २०२१ या कालावधीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेने वर्तवली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील आदिवासी आश्रमशाळेतील १५ मुले आणि पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालय ७२ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले असून, या शाळेत ४०३ विद्यार्थी राहतात. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय, भिवंडीतील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रमशाळेत २० मुले कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी वसतिगृहातील मुले व त्यांच्या संपर्कात आलेल्या पालक व नातेवाईकांचा आरोग्य यंत्रणेतर्फे शोध घेतला जात आहे.
कोरोनासह ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचना दिल्या असल्या तरी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. शाळा, महाविद्यालयांतील वाढता संसर्ग प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे. अहमदनगर, पुण्यानंतर आता नाशिकच्या पंचवटी येथील एका दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाचा रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या नाशिकमध्ये ८३१ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ग्रामीण भागात २40 रुग्ण आहेत तर महापालिकेच्या हद्दीत 548 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मालेगाव महापालिका क्षेत्रात 10 रुग्ण आहेत तर जिल्ह्याबाहेरील 33 रुग्णांचा यात समावेश आहे.
वसतिगृहात विविध ठिकाणांहून मुले-मुली वास्तव्यास येतात. त्यांच्या संपर्कात त्यांचे आई-वडील, नातेवाईक व परिसरातील नातेवाईक असतात. त्यातील एखाद्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग असल्यास त्याची लागण मुलास होते. मात्र, सुरुवातील सौम्य लक्षणे असल्याने मुले व त्यांचे नातेवाईक दुर्लक्ष करतात. ती मुले वसतिगृहात आल्यानंतर इतर मुलांसोबत राहतात. शिवाय, एकच बाथरुम वापरतात. त्यातून कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. बाधित मुलाच्या संपर्कात आल्याने राज्यातील वसतिगृहातील मुले बाधित आढळून आली आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
असा आहे धोका..
सार्वजनिक ठिकाणे असलेल्या वसतिगृह, शाळा, महाविद्यालयांत विविध ठिकाणांहून विद्यार्थी येतात. सर्वजण एकाच वर्गात येतात. यावेळी सोशल डिस्टन्सिंग नियमांचा फज्जा उडत आहे. शिवाय, बाथरुम. बेसिन एकच असल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे.
काय काळजी घ्यावी?
घराबाहेर जाताना प्रत्येक व्यक्तीने मास्क, सॅनिटायझर घ्यावे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. आजारी असलेल्या व्यक्तीने घराबाहेर जाणे टाळावे. शिवाय, आजारी व्यक्तीने तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत. सुदृढ नागरिकांनीही आजारी व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये.
सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याने नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी विनाकारण जावू नये. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी, नाशिक महापालिका