जिल्ह्यात संततधार चालू असल्याने निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरण भरले आहे. धरणातून काल २४००० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. वाहत्या पाण्याच्या बाजूला जाऊन फोटो सेशन करण्यात तरुणाई दंग असल्याचे दिसून येत आहे. वाहत्या पाण्यासोबत सेल्फी आणि फोटोसेशन करून स्वतः सोबतच इतरांचा देखील जीव धोक्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने घोधित केलेल्या नो सेल्फी झोनच्या नियमांचे देखील पर्यटकांकडून तीन तेरा वाजवले जात आहे.
मोबाईलमध्ये चांगल्या प्रकारचे कॅमेरे आणि उच्च दर्जाची प्रणाली असल्याने तरुणाई पासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना फोटोसेशन आणि सेल्फीचे जणू वेडच लागल्याचे चित्र आहे. या बाबतीत काळजी घेण्याचे आवाहन करणे तसेच अशा हौशी लोकांना समजावून सांगण्याच्या पलीकडे प्रशासन देखील काहीच करू शकत नाही. अशा हौशी आणि अतिउत्साही पर्यटकांना तसेच तरुणांना आवर घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत शहरातील १३ तर जिल्ह्यातील ३४ ठिकाणी नो सेल्फी झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र पर्यटक, तरुण, वयस्कर यांना अशा ठिकाणी गेल्यावर फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. सद्य परिस्थितीमध्ये पोलिसांनी देखील अशा संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवली आहे. मात्र पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर तेवढ्यापुरते फोटोसेशन थांबवाले जाते आणि पुन्हा पोलिसांची पाठ झाल्यास पुन्हा सुरु होत आहे.
हे आहेत नो सेल्फी झोन
- नाशिक शहर : रामकुंड, चामर लेणी, नवश्या गणपती, रामशेज किल्ला, सोमेश्वर धबधबा, तपोवन, संत गाडगे महाराज पूल, बापू पूल, व्हिक्टोरीया पूल, चोपडा लॉन्स पूल, गंगापूर धरण, आशेवाडी रामशेज किल्ला, पांडव लेणी.
- इगतपुरी : बोरली, भावली धरण, अशोक धबधबा, कसारा घाट परिसर, ट्रिंगलवाडी किल्ला, वैतरणा धरण, भातसा नदी, अलंग-कुलंग-मलंग, कॅमल व्हॉली, घाटनदेवी, विपश्यना केंद्र.
- सुरगाणा : भंगू धबधबा, हातगड किल्ला, सापुतारा रोड.
- बागलाण : साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी’
- निफाड : नांदूर मध्यमेश्वर
- त्र्यंबकेश्वर : पहीने, ब्रम्हगिरी, दुगरवाडी, अंजनेरी, कुशावर्त, हरिहर गड, दाभोसा धबधबा, वाघेरा घाट, तोरंगन घाट, मंदिर परिसर.
- येवला : अगस्ती ऋषी किल्ला, अंकाई किल्ला.
- कळवण : सप्तशृंगी गड
- चांदवड : रेणुकादेवी मंदिर, धोडप किल्ला
पर्यटन करताना सामाजिक भान जपावे
लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. पर्यटन जरूर करावे पण जीवावर बेतेल असे वर्तन करू नये. सामाजिक बांधिलकी जपावी प्रशासनाला सहकार्य करावे. आततायीपणा करू नये. – रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक