सोमवारपासून ग्रामीण भागासह शहरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याअनुषंगाने माध्यमिक शिक्षण विभाग दोन दिवसांत शहरातील शाळांविषयी अहवाल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. तर, ग्रामीण भागातील शाळांविषयी प्राथमिक शिक्षण विभाग हा अहवाल देणार आहे.
शहरातील आठवी ते बारावीपर्यंत, तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येतील. शहरात व ग्रामीण भागात नेमक्या किती शाळा सुरु करणे शक्य होईल, याविषयी आता चाचपणी केली जात आहे. माध्यमिक शिक्षण विभाग व प्राथमिक शिक्षण विभाग लवकरच जिल्हाधिकार्यांना अहवाल देतील. यानंतरच शाळा सुरु करण्याविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल. गेल्या ऑगस्ट महिन्यात ग्रामीण भागातील इ.आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत. त्याच धर्तिवर आता शहरातील शाळा सुरु करणे शक्य आहे का? याची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, शाळा सुरु करण्यापूर्वी त्यांचे सॅनिटायझेशन, स्वच्छता आदी खर्चासाठी निधीही द्यावा लागेल.