नाशिक : लॉकडाऊनचा कालावधी वाढला तर परीक्षांचे काय होणार, असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला सध्या सतावतो आहे. पण मविप्र शिक्षण संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांतर्गत परीक्षा ऑनलाईन घेण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरण व मानवाधिकार या विषयांच्या परीक्षा ऑनलाईन घेवून विद्यार्थ्यांना ग्रेड स्वरुपात गुणही दिले आहेत. विशेष म्हणजे कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील हजारांवर विद्यार्थी यात सहभागी झाल्याने हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाल्याचे दिसून येते.
पदवी अभ्यासक्रमाच्या पर्यावरण या विषयाचा 50 गुणांसाठी बहुपर्यायी स्वरुपाची परीक्षा घेतली. यात बी. व्होक अभ्यासक्रमाचे सुमारे आठशे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे प्रत्येकी 65 ते 70 टक्के विद्यार्थ्यांनी ही ऑनलाईन परीक्षा दिली. 50 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दोन तासांचा अवधी होता. या परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा ही परीक्षा देता येईल. तसेच महाविद्यालय सुरु झाल्यानंतर ऑफलाईन स्वरुपातही परीक्षेस बसण्याची सुविधा आहे. मात्र, प्रायोगिक तत्त्वावर या परीक्षा यशस्वी झाल्याचे दिसून येते. तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या मानवाधिकार (ह्यूमन राईट्स) या विषयाचा पेपर या पध्दतीने पार पडला. महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही यात सहभाग नोंदवला. संस्थेच्या सिन्नर, निफाड आदी ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत या सराव परीक्षेचा लाभ घेतला. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी नोंदवण्याची सुविधा या क्लासरुममध्ये आहे. विद्यार्थ्यांच्या फिडबॅकनंतर या अडचणी सोडवून सुधारित पध्दतीने परीक्षा घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यात गणित विषयाचे चेतन शिरोरे व पर्यावरण विभागाचे प्रवीण नलावडे यांनी परिश्रम घेतले.
&
पर्यावरण, मानवाधिकार विषयाची महाविद्यालय अंतर्गत परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांना ग्रेड पध्दतीने गुण दिले. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभागी होता आलेले नाही, त्यांना ऑफलाईन स्वरुपात परीक्षेस बसता येणार आहे.
-डॉ.व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य (केटीएचएम महाविद्यालय)