नाशिक : जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के कमी पाऊस झाला आहे. पावसाळा अंतिम टप्प्यात असताना ती कसर भरून निघण्याची शक्यता धूसर झाली आहे. या एकंदर स्थितीमुळे अनेक भागातील टंचाईचा प्रश्न आजही कायम आहे. सद्यस्थितीत ९८ गावे आणि १४१ वाड्या अशा २३९ ठिकाणी एकूण ८६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे.
पावसाअभावी अनेक भागात खरीप पिके हातातून गेली. पावसात मोठा खंड पडला. परतीच्या पावसाला सुरुवात होत असताना लहान-मोठ्या धरणांमध्ये अद्याप १६ टक्क्यांची कमतरता आहे. स्थितीमुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होण्याचे संकेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या दैनंदिन अहवालावरून मिळत आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ९०९ मिलीमीटर पाऊस होतो. यंदा आतापर्यंत केवळ ६०७ मिलीमीटर म्हणजे ६६.८ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १३० टक्के होते.
संपूर्ण जिल्ह्यात दिंडोरी या एकमेव तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे (११८ टक्के) पाऊस झाला आहे. उर्वरित सर्व तालुके अखेरपर्यंत पावसाच्या प्रतिक्षेत राहिले. मालेगाव तालुक्यात (७२.५), बागलाण (७४.९). कळवण (७२.४). नांदगाव (९६.३), सुरगाणा (६१.१), नाशिक (७७.८), दिंडोरी (११८.७), इगतपुरी (५२.६), पेठ (७२.५), निफाड (७३.१), सिन्नर (६२.४), येवला (८७.७), चांदवड (७१.६), त्र्यंबकेश्वर (७३) आणि देवळा तालुक्यात (७१.८) टक्के असे पावसाचे प्रमाण आहे. घाटमाथ्यावरील भागात अधूनमधून जोरदार पाऊस झाला होता. परंतु, तिथेही सरासरी गाठली गेली नसल्याचे दिसून येते. ही बाब टंचाईचे सावट अखेरपर्यंत दूर न होण्याचे कारण ठरली.
सात तालुक्यात टँकरने पाणी
आजही या तालुक्यात ८६ टँकरच्या १९५ फेर्यांमधून पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. टंचाईची सर्वाधिक झळ येवला तालुक्यास बसली. या तालुक्यातील ३४ गावे आणि १५ वाडी अशा एकूण ४९ ठिकाणी २२ टँकरने पाणी पुरविले जात आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्याचीही टंचाईतून सुटका नाही. या तालुक्यात १४ गावे व १९ वाडी अशा ३३ ठिकाणी १५ टँकर पाणी दिले जात आहे. चांदवड तालुक्यात २० गावे व ३९ वाड्या २१ टँकर, नांदगाव १९ गावे व ५५ वाड्या १८ टँकर, बागलाण ३ गावे व ४ वाड्या ३ टँकर, देवळा ५ गावे व ३ वाड्या ५ आणि सिन्नर तालुक्यात ३ गावे व ६वाड्या २ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.