नीलेश बोरा : लासलगाव
फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्या हापूस आंब्याला भारताबरोबर विदेशातही तितकीच मागणी आहे. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही लासलगावमार्गे सुरू झाली आहे. दरवर्षी १५ एप्रिलपासून ते १५ जुलैपर्यत आंबा विदेशात निर्यात केला जातो. मात्र, यावर्षी जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाल्याचा फटका हापूस आंब्याला बसला असून, आंबा उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. जेट एअरवेज बंद पडल्याने अन्य विमान कंपन्यांनी कार्गोचे दर वाढवले आहे. परिणामी निर्यातकारांनी निर्यातच कमी केली आहे. यामुळे आंबा मोठ्या प्रमाणात देशातच पडून आहे. दर कमी होऊन ग्राहकांचा फायदा होत असला, तरी आंबा उत्पादकांचे मात्र नुकसान झाले आहे.
जेट एअरवेजने फ्रान्सच्या केएलएम कंपनीसह कार्गो वाहतूक सुरू केली होती. त्याद्वारे मुंबईतून फळे व भाज्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती. जेट एअरवेज सुरू असताना मुंबईहून सर्व प्रकारच्या आंब्याची दररोज सुमारे २०० टन निर्यात होत होती. परंतु, जेटने सेवा बंद केल्याने अन्य कंपन्यांनी निर्यातीचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढवले आहेत. या दरवाढीचा परिणाम आंब्याच्या किंमतीवर होऊ लागला असून, परदेशातील ग्राहक १५ ते २० टक्के अधिक दराने आंबा खरेदी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे निर्यातदारांनी निर्यातच कमी केली आहे. परिणामी आंबे निर्यातीला फटका बसला आहे.
दरांत वाढ
जेट एअरवेज सुरू असताना सर्व कंपन्या मिळून विदेशात मोठ्या प्रमाणात आंबा निर्यात करत होते. त्यावेळी युरोपात आंबा पाठवण्यासाठी ९० रुपये प्रतिकिलो खर्च येत होता. आखाती देशांसाठीचा दर ५० रुपये किलो होता. जेटच्या सेवा बंद पडल्यानंतर आता युरोपसाठीचा दर १२० तर आखाती देशांचा दर ७० रुपये प्रतिकिलो झाला आहे. तर कतार साठी ६० रुपये किलो तर सध्या ८४ रुपये प्रतिकिलो, असा दर लागत आहे. त्यामुळे या वाढलेल्या दराचा आंबा निर्यातीला फटका बसत आहे
७ नागरी हवाई वाहतूक कंपन्या बंद
गेल्या पाच वर्षांत बंद पडलेली जेट एअरवेज ही देशातील सातवी नागरी हवाई वाहतूक कंपनी आहे. यापूर्वी एअर पेगासस, एअर कोस्टा, एअर कार्निव्हल, एअर डेक्कन, एअर ओडिशा व झूम एअर किंगफिशर या विमानसेवा देणार्या कंपन्या बंद पडल्या आहेत.
२५० मैट्रिक टन आंब्यावर प्रक्रिया
लासलगाव येथील कृषकमधून या हंगामात २५० मैट्रिक टन आंब्यावर प्रक्रिया पूर्ण करून निर्यातीसाठी रवाना करण्यात आला आहे.