दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी अखेर पुणेगाव धरणात पडले असून, येवला, चांदवड, नांदगाव या दुष्काळी तालुक्यातील शेतकर्यांनी अनेक वर्षापासून पहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी २००६ पासून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले.
दोन दिवसाच्या पावसातच मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी बोगद्यातून पुणेगाव धरणात आले आहे. संपूर्ण राज्यात मांजरपाडा प्रकल्प गाजला होता. देवसाने प्रकल्पाच्या बोगद्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. परंतु, हे काम करत असताना देवसाने परिसरातील अनेक आदिवासी शेतकर्यांंच्या जमिनी गेल्या. वनक्षेत्राच्या या जागेत पूर्वी जंंगल होते व अनेक रानमेव्याची झाडे होती. मांजरपाडा प्रकल्पाचे काम सुरू झाले आणि येथील वनसंपदा कामांमध्ये नष्ट झाले. तत्कालिन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, नरहरी झिरवाळ यांच्या पाठपुराव्यामुळे मांजरपाडा प्रकल्पाला मंजुरी दिली होती व वित्तमंत्री झाल्यावर प्रकल्पाला निधीही मंजूर करुन दिला. प्रकल्पाचे काम आता पूर्ण झाले असून गेल्या दोन दिवसाच्या पावसात पाणी बोगद्यातून वाहिले व पुणेगाव धरणात आले. याचा आनंदोत्सव आमदार झिरवाळ व गावकर्यांनी प्रकल्पावर साजरा केला.
अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेथे जांभुळाचे झाडही लावण्यात आले. तेथे पुन्हा औषधे वनसंपत्तीचे संवर्धन व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अजित पवार यांच्या प्रयत्नाने प्रकल्पाची उरलेली जमिन पुन्हा ग्रामपंचायतीकडे वृक्षसंवर्धनासाठी दयावी, अशी मागणी करणार असल्याचेही झिरवाळ म्हणाले. यावेळी प्रकल्पबाधित शेतकरी, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, डॉ. योगेश गोसावी, शाम हिरे, नीलेश गटकळ, पंढरीनाथ ढोकरे, भाऊसाहेब गणोरे, मधुकर फुगट, नारायण पालखेडे, डॉ. विजय गटकळ आदी उपस्थित होते.