पंजाबच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत येथील शेतकर्यांना वीजबिल व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला. याच धर्तिवर नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना वीजबिल व पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.23) स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी भाजपचे गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीचा मुद्दा उपस्थित केला. नांदगाव, येवला, चांदवड आदी तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकर्यांचे काद्यांचे पीक वाहून गेले. कपाशी, भुईमुग, सोयाबिन, मका आदी पिके जागेवरच सडून चालली आहेत. अगोदरच शेतीमालाला भाव नाही. त्यात अशा परिस्थितीत महावितरण कंपनी शेतकर्यांकडून सक्तिची वीजबिल वसूली करत आहे. पंजाबच्या धर्तिवर नाशिक जिल्ह्यातही शेतकर्यांना वीजबिल व पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव त्यांनी केला. अध्यक्ष क्षीरसागर यांनीही शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यांचे वीज कनेक्शन तोडू नका अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच कृषी सभापती संजय बनकर यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची पुढील आठवड्यात बैठक घेण्याची मागणी केली. यावेळी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती सुरेखा दराडे, अश्विनी आहेर, सुशीला मेंगाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, समिती सदस्य महेंद्र काले, डी. के. जगताप, सविता पवार, छाया गोतरणे आदी उपस्थित होते.
‘लम्पी स्किन’वर औषध नाही!
जनावरांना ‘लम्पी स्किन’ हा त्वचारोग होत असल्याने जिल्ह्यातील 5 लाख 83 हजार गुरांचे लसीकरण करण्याचे टार्गेट पशुसंवर्धन विभागाने ठेवले आहे. त्यापैकी 4 लाख 43 हजार गुरांना ही लस देण्यात आली. उर्वरीत साधारणत: दीड लाख गुरांना लस देण्यात येत आहे. परंतु, लम्पी स्किन या आजावर प्रभावी औषध उपलब्ध नसल्याने लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचे स्पष्टीकरण कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी दिले. लसीकरणाचा पुरवठा करण्यासाठी 24 लाख 43 हजार रुपये ग्राम पंचायतींना पाठवल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी सभागृहात सांगितले