भरधाव पिक-अप आणि मोटारसायकल यांच्यातील अपघातात चार तरुण विद्यार्थी ठार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील औंदाणे शिवारात घडली. या घटनेत एकाच गावातील चौघे तरुण ठार झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुंधे-तळवाडे गावातील अनिल दगडू माळी, समाधान दादाजी पटाईत, शरद तानाजी सोनवणे आणि अरूण प्रकाश ठोंबरे हे तरूण कंदूरीच्या कार्यक्रमासाठी अंतापूरला गेले होते. हा कार्यक्रम आटोपून एकाच दुचाकीवरून चौघेही तरूण गावाकडे परतण्यासाठी निघाले होते. त्यांची गाडी औंदाणे शिवारातील सटाणा-ताहाराबाद महामार्गावर असताना समोरून येणाऱ्या चारचाकीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात चौघाही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ सटाणा -ताहाराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताचे वृत्त कळताच त्यांच्या गावाला धक्का बसला. सर्व तरुण महंत भाणेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.