नाशिक : परंपरागत गणेश विसर्जन मिरवणुकीत बदल करण्यात आला आहे. दरवर्षी दुपारी १ वाजता सुरु होणारी मिरवणूक यंदा सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे.. विसर्जन मिरवणूक मार्गही निश्चित करण्यात आला असून वाकडी बारव येथून मिरवणूकीला सुरूवात होईल आणि गोदाघाटावर समारोप करण्यात येईल. या मिरवणुकीत २१ गणेश मंडळांचा सहभाग असेल.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी महापालिका, पोलिस प्रशासन, गणेश मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी भद्रकाली पोलीस ठाण्यात झाली. यावेळी शहरातील 29 मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय पोलीस प्रशासनातील अधिकारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात चर्चा झाली. कोरोनाचे निर्बंध हटल्याने यंदा गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणूक दणक्यात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या मंडळ हे ठिकठिकाणी खूप वेळ थांबतात. मात्र याचा परिणाम शेवटी क्रमांक असलेल्या मडंळावर होतो. शेवटच्या मंडळांना रात्री एमजीरोड येथे येण्यासाठी रात्रीचे बारा वाजतात.
परिणामी मिरवणूक अर्ध्यावरच सोडावी लागत असल्याने मानाचे गणपती वगळून इतर मंडळांना चिठ्ठी पध्दतीने क्रमांक देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. मात्र पदाधिकार्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवल्याने २०१९ प्रमाणेच मिरवणूकीत मंडळांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. यावेळी गजानन शेलार, विनायक पांडे, प्रथमेश गिते, दिनेश कमोद, गणेश मोरे, गणेश बर्वे आदीसह गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उशीर केल्यास होणार गुन्हे दाखल पारंपरिक पद्धतीने वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघणार असून मिरवणुकीला उशीर केल्यास गुन्हे दाखल होणार आहेत. तर लाईट असलेले मंडळ शेवटी राहणार असून स्वागतासाठी मंडळ पदाधिकार्यांनी स्टेजवर जाणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मंडळांच्या बैैठकीत हे निर्णय घेण्यात आले
- गुलालाचा वापर करु नये
- स्वागत समितीची व्यासपीठ तीन ते चार फुट असावे
- स्वागतासाठी समितीच्या पदाधिकार्यांनी मंडकांकडे जावे
- दोन मंडळामध्ये जास्त अंतर निर्माण होवू नये यासाठी स्वंयसेवक नेमावे
- नियमांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल केले जाणार
प्रत्येक मंडळाला २० मिनिटे
गणेश विर्सजन मिरवणुकीच्या दृष्टीने प्रमुख 17 चौकात प्रत्येक गणेश मंडळांना केवळ 20 मिनिटे थांबण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. दोन मंडळांमध्ये जास्त अंतर न होवू देणे ही त्या पदाधिकार्यांची जबाबदारी असेल. तर मंडळांने नियमांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहे.