धार्मिक पर्यटनासह कृषी व निसर्ग पर्यटनानिमित्त नाशिक जिल्ह्यात देशभरातील भाविक व पर्यटक वाहनांसह मोठ्या संख्येने येतात. जिल्ह्यात नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी देवी व शिर्डी देवस्थान असल्याने मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नाशिक–पुणे राज्यमाग आणि सिन्नर–शिर्डी राज्यमार्गावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच, या मार्गावरुन दिल्ली, मुंबई, पुणेसह देशभरातील विविध ठिकाणी कच्चा माल, कंपन्यांचे साहित्य नेण्यासाठी अवजड वाहनांची गर्दी असते. अनेक बेशिस्त वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात, स्थानिक वाहनचालक मार्गावरुन जातान पंक्चरचा वापर करतात. त्यातून दुचाकी, कारसह माल वाहतूक करणार्या वाहनांमध्ये २०१८ मध्ये सर्वाधिक अपघात झाल्याचे आकडेवारीवरुन समोर आले.
२०१८ मध्ये 764 जीवघेणे अपघात झाले असून त्यात 824 जणांचा बळी गेला होता. तर, २०१९ मध्ये 724 जीवघेणे अपघात झाले असून, 767 जणांचा बळी गेला. अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) जाहीर केली आहेत. वर्षभर विशेष मोहिमेअंतर्गत ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, हेल्मेट ड्राईव्ह घेतल्याने अपघातांत घट झाली आहे.
वर्षनिहाय अपघात आकडेवारी
महिना २०१९ २०१८
जानेवारी 73 71
फेब्रुवारी 74 73
मार्च 75 73
एप्रिल 55 79
मे 97 74
जून 41 85
जुलै 65 56
ऑगस्ट 57 64
सप्टेंबर 54 57
ऑक्टोंबर 57 64
नोव्हेंबर 56 66
डिसेंबर 63 62
एकूण 767 824
—————–
जिल्ह्यात वर्षभर विशेष मोहिमेअंतर्गत ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, हेल्मेट ड्राईव्ह राबविण्यात आली. धार्मिक पर्यटनानिमित्त पर्यटकांची सिन्नर–शिर्डी, नाशिक–पुणे व मुंबई–आग्रा महार्मागावर सर्वाधिक गर्दी होत असल्याने या मार्गांवर विशेष लक्ष केंद्रीत करत ब्लॅक स्पॉट जाहीर करुन पंक्चर बंद केले. वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी जनजागृती करत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केल्याने २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये ५७ अपघात कमी झाले आहेत.
डॉ. आरती सिंह पोलीस, अधीक्षक