नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किराणा आणि ड्रायफ्रुटच्या मालाला मागणी वाढली आहे. परंतु यंदा तेलाचे दर वाढल्याने फराळाच्या पदार्थांना महागाईचा तडका बसला आहे. तेलावर उपकर कमी करत दरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, सध्याचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत.
खाद्यतेलाचे ऑगस्ट २०२० पर्यंत थोडे स्थिर होते; मात्र त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरवाढ होत गेली आहे. खाद्यतेलाचा भडका उडाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला. करडईसह तीळ, मोहरी तेलाने लिटरमागे २०० रुपयांचा, तर अन्य खाद्यतेलांनीही दीडशे रुपयांचा टप्पा गाठला आहे. केंद्र सरकारने पाम, सोयाबीनसह सूर्यफुलाच्या कच्च्या तेलाच्या आयात शुल्कात कपात केली आहे. कृषी उपकरही कमी केला. त्याचा परिणाम, या खाद्यतेलाच्या दरावर दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दिवाळीत फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी रवा, मैदा, साखरेला मागणी असते. यंदा बाजारपेठेत साखर, रवा, मैद्याचे भाव स्थिर असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.