नाशिक ते मुंबई असा भव्य लाँग मार्च काढलेल्या किसान सभेच्या मागण्यांबाबत शासन स्तरावरुन गांभीर्याने विचार सुरू असून, या मागण्या आणि शासन निर्णयासंदर्भातील पत्र नाशिकमध्ये दाखल झालेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हाती आले आहे. हे पत्र घेऊन गेलेल्या पालकमंत्री महाजन यांची विल्होळी येथे किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत सायंकाळी ५ वाजेपासून चर्चा सुरू आहे. या बैठकीनंतरच आंदोलक शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे.
मुंबईच्या दिशेने निघालेल्या किसान सभेच्या लाँग मार्चचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, यासाठी शासन स्तरावर गांभीर्याने विचार सुरू आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मुंबईत पोहोचण्यापूर्वीच मिटावे, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वतीने पालकमंत्री महाजन गुरुवारी, २१ फेब्रुवारीला नाशिकमध्ये दाखल झाले. रात्री ९ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि पालकमंत्री यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली होती. त्यामुळे आंदोलकांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरु केली. दरम्यान, पालकमंत्री सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते. अखेर दुपारी २ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री कार्यालयाकडून मागण्यांसंदर्भातील एक पत्र पालकमंत्र्यांना प्राप्त झाले आणि दुपारी ३ वाजता ते भेटीसाठी रवाना झाले. दरम्यान, वनजमिनी नावावर कराव्यात, सरकारी दाखल्यांवर नावे लावावीत, पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वेकडे वळवावे, अशा विविध मागण्यांसाठी किसान सभेने मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.