पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीस दोषी धरत जिल्हा न्यायाधीश अभय वाघवसे यांनी त्यास पाच वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. पती शिवाजी श्रावण खेताडे (३०, रा.वासाळी, ता.इगतपुरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना ११ जून २०१५ रोजी वासाळी (ता.इगतपुरी) येथे घडली होती.
शिवाजी खेताडे हा पत्नी आशा खेताडे (२७)समवेत वासाळी (ता.इगतपुरी) येथे राहत होते. ११ जून रोजी तुला अंड्याची भाजी करण्यास सांगितले होते. ती का केली नाही, या कारणावरुन त्याने पत्नीशी भांडण केले. माहेरच्यांनी लग्नात हुंडा दिला नाही, याचा राग मनात धरुन त्याने तिच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक के. डी. बच्छाव यांनी करत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटला प्रथम न्यायाधीश नायर यांच्या न्यायालयात चालल. त्यानंतर प्रधान जिल्हा न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या न्यायालयात वर्ग होवून पुढील सुनावणी झाली. आरोपीने पत्नीचा खून केला नसला तरी मारहाणीमुळे पत्नीचा जीव जावू शकतो, याची जाणीव असल्याने व तसा पुरावा न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यास न्यायाधीश वाघवसे यांनी मनुष्यवधाखाली दोषी धरुन शिक्षा सुनावली. १२ साक्षीदारांच्या साक्षी, परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरुन शिक्षा सुनावली. खटला सरकारी वकील एस. जी. कडवे यांनी चालविला. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक निसार सैय्यद, पोलीस हवालदार व्ही. बी. निचीत, ज्योती उगले यांनी कामकाज पाहिले.