शाळा व महाविद्यालयीन तरुणाई व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. दारुला पर्याय म्हणून वाईन किंवा गांजा यांचा नशा म्हणून सर्रासपणे वापर केला जातो. विशेष म्हणजे, व्यसनाधीन व्यक्तींमध्ये 18 ते 21 या वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक असून, मुलांप्रमाणेच मुलींची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. आपली मुलगी व्यसन करते हे इतरांना लक्षात येऊ नये, म्हणून पालकच त्यांची माहिती लपवण्याचा प्रयत्न करतात. व्यसनाच्या आहारी गेलेले तरुण हाताबाहेर जाण्याच्या स्थितीत असताना त्यांच्यावर उपचार करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. उच्चभ्रू वस्तीतील मुलीदेखील आपले कथित स्टेटस जपण्यासाठी किंवा मित्रांच्या आग्रहास्तव वाईन घ्यायला लागतात. ही वाईनच त्यांच्या आयुष्यातील व्यसनाची सुरुवात ठरत असल्याचे उपचारार्थी डॉक्टर सांगतात. गंभीर बाब म्हणजे वाईनला मिळत असलेली समाजमान्यता आणि दारुरहीत पेय म्हणून त्याचा गेला जाणार उदोउदो, यामुळे मुलांप्रमाणेच मुलींही व्यसनात अग्रेसर ठरल्या आहेत. पुण्याचे प्रसिद्ध लेखक अनिल अवचट यांनी सुरू केलेल्या ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्रात प्रत्येक वर्षी दोन हजार व्यक्तींवर उपचार होतात. तसेच ‘निशिगंध’ व्यसनमुक्ती केंद्रात याच प्रमाणात महिलांवर उपचार होतात. पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण धक्कादायक ठरणारे असून, नाशिकमधून प्रत्येक महिन्याला आठ ते दहा तरुणी येथे प्रविष्ट होतात. त्यांची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाते. मात्र, नाशिकच्या तरुणाईमध्ये विविध प्रकारची व्यसनाधिनता वाढत असताना यात वाईननेदेखील भर घातल्याचे दिसून येते.
पुण्यातील ‘मुक्तांगण’मध्ये प्रत्येक महिन्याला 180 व्यक्तींवर व्यसनमुक्तीचे उपचार केले जातात. दोन ते अडीच महिन्यांनंतर येथे प्रवेश दिला जातो. महिलांसाठी ’निशिगंध’ हे स्वंतत्र केंद्र सुरु केले आहे. येथे नाशिकच्या आठ ते दहा तरुणींचा समावेश असतो.
अविनाश ढोली, समुपदेशक, नाशिक (मुक्तांगण)