राज्याच्या व्यापार-उद्योग-कृषी आणि सेवा क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत संतोष मंडलेचा यांचा बहुमताने विजय झाला. तर, वरिष्ठ उपाध्यक्षपदी ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली. मंडलेच्या यांच्या विजयाने नाशिकला तिसऱ्यांदा या समितीवर स्थान मिळाले आहे.
चेंबरच्या ९२ वर्षांच्या इतिहासात अध्यक्ष निवडीसाठी प्रथमच निवडणूक जाहीर झाली होती, त्यामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्राचे याकडे लक्ष लागले होते. विद्यमान अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि विद्यमान वरिष्ठ उपाध्यक्ष अमित कामत यांच्यात अध्यक्षपदासाठी मोठी चुरस होती. त्यात तब्बल ९४ टक्के मते मिळवून मंडलेचा मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. विशेष म्हणजे ३० वर्षांत प्रथमच सलग तिसऱ्या वर्षी अध्यक्षपदाचा मान मंडलेचा यांना मिळाला. अध्यक्षपदासोबतच वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठीही निवडणूक जाहीर झाली होती. त्यात ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीने पश्चिम महाराष्ट्राला प्रथमच वरिष्ठ उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
उद्योजकांसाठी पायाभरणी
स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासह मदतसाठी उद्योजक शेठ वालचंद हिराचंद यांनी पुढाकार घेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली होती. तेव्हापासून आजवर महाराष्ट्राच्या औद्योगिक पायाभरणीमध्ये चेंबरने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शेठ वालचंद हिराचंद, लालचंद हिराचंद, आबासाहेब गटवारे, एकनाथ ठाकूर, दांडेकर, डहाणूकर, बजाज, कासलीवाल, दोशी, ढमढेरे, माधवराव आपटे, भरत गुलाबचंद यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी चेंबरचे अध्यक्षपद भूषविले आहे.
उद्योग क्षेत्राला ऊर्जा मिळवून देण्याचे ध्येय
उद्योग आणि उद्योजकांना सध्या जीएसटीमधील त्रुटी, एमएसएमईच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण, वीज दरवाढ अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्या सोडविण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यात उद्योजक-लोकप्रतिनिधी यांचा योग्य समन्वय घडवून आणू. राज्य सरकारच्या संयुक्त विदयमाने ग्लोबल महाराष्ट्राच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन व परिषदेचे आयोजन, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन, महाराष्ट्र स्नेहसंमेलन असे उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. – संतोष मंडलेचा