तिसर्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी जाणार्या भाविकांची वाहतूक करण्यासाठी एसटीने सोडलेल्या जादा बसपैकी 100 गाड्यांनी रविवारी संध्याकाळी (दि.18) सहा वाजेपर्यंत 200 फेर्या केल्या होत्या. नाशिकच्या ईदगाह मैदानावरून सकाळी 8 वाजेपासून गाड्या सोडण्यात येत होत्या. दुपारनंतर भाविकांची बसस्थानकावर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली होती.
एसटीच्या जादा गाड्या यंदा निमाणी बसस्थानक, नाशिकरोड बसस्थानक, सिडको आणि सातपूर येथून गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे ईदगाह मैदानावर उभारलेल्या तात्पुरत्या बसस्थानकात होणारी गर्दी विभाजित झालेली होती. एसटीच्या गाड्या मैदानात सज्ज होत्या. त्यामुळे अधिक संख्येने शिवभक्त आले तरी त्यांना ईदगाह मैदान बसस्थानकातून तात्काळ गाडी उपलब्ध होत होती. जादा बसपैकी संध्याकाळी एसटीच्या 50 गाड्यांनी 100 फेर्या केलेल्या होत्या. तर 50 नियमित गाड्यांच्याही 100 फेर्या झालेल्या होत्या. दुपारी सोडलेल्या गाड्या थेट त्र्यंबकेश्वरला जात होत्या. त्यामुळे खंबाळे येथे भाविकांना उतरून पुढे रवाना होण्यासाठी दुसर्या बसगाड्या धरण्याची वेळ पडली नाही. तसेच पहिने, अंबोली आणि जव्हार या मार्गावरील बसगाड्यांच्याही फेर्या रात्री वाढलेल्या होत्या.
श्रावण सरींचा शिडकावा
त्र्यंबकेश्वरला रवाना होणार्या शिवभक्तांना ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करताना २१ किलोमीटर पायी चालावे लागते. यंदा त्र्यंबकला पाऊस चांगला आहे. त्याचबरोबर नाशिकमध्येही श्रावण सरी दिवसभर कोसळत होत्या.