नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेची निवडणूक घोषित होण्यापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. विरोधी गटाचे माजी सभापती अॅड.नितीन ठाकरे यांच्या समर्थकांनी संस्थेच्या कारभारावर आक्षेप घेणार्या पोस्ट तयार केल्या आहेत. तर सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या समर्थकांनी आरोपांना प्रत्युत्तर देत पाच वर्षांत संस्थेत झालेल्या विकासाचे मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
मविप्र संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची लवकरच घोषणा होणार आहे. मंतदार यादी अंतिम झाली असून, आता लवाद नियुक्तीची प्रतीक्षा लागून आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘सोशल वार’ सुरु झाल्याने निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येते. विरोधकांकडून होणार्या आरोपांचे सत्ताधारी गटाकडून खंडन केले जात असताना सभासदांच्या भावना विचारात घेवून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र, निवडणूक अटळ असल्याचे दिसून येते.
अॅड.ठाकरे समर्थकांचे आरोप
- सामान्य सभासदांची कामे होत नाहीत
- प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मन द्रवत नाही
- दहा वर्षांत उदयाला आलेली सत्ताकेंद्र
- सभासदांची, शिक्षकांची, सेवकांची कोणाचीच या असंवेदनशील शिक्षण सम्राटांच्या मनमानीतून सुटका नाही
- सभासदांच्या वाट्याला फक्त टोलवाटोलवी
- निफाड तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुकीत हस्तक्षेप
- संस्थेतील कर्मचार्यांचा प्रचारासाठी उपयोग
- एकाच घरातील तीन सत्ताकेंद्र, त्यांच्याकडून संस्थेच्या कामात हस्तक्षेप
- मराठा उरला नावापुरता, मुला नातवंडांचे प्रवेश, शिक्षक सेवकांच्या अन्याय बदल्या
- व्यापारी, बिल्डरांशी रोज टेबलाखाली हातमिळवणी
- वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना काळात घोटाळा
पवार समर्थकांचे प्रतिउत्तर
- सामान्य सभासदांसह कार्यकारी मंडळात महिलांना स्थान दिले
- विकासाच्या मुद्यावर बोलण्याऐवजी घरगुती मुद्यांवर विरोधकांचा आक्षेप
- दहा वर्षात संस्थेला उंचीवर घेवून गेले
- शिक्षक, सभासद, सेवकांची कामे झाली, महिलांना सोयीच्या ठिकाणी बदली दिली
- सभासदांना वैद्यकीय महाविद्यालयात सोयीसुविधा, प्रवेशास प्राधान्य
- ग्राम पंचायतींच्या निवडणुकीचा विषय संस्थेशी जोडणे अयोग्य
- कर्मचार्यांना एकाही निवडणुकीत सहभागी करुन घेतलेले नाही
- संस्थेतील विकासाच्या मुद्यावर बोलता येत नाही म्हणून कौटुंबिक आरोप
- मराठा समाजाची ही संस्था असल्याने त्यांना सर्वाधिकार
- कोरोनाकाळात सभासदांसह जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तींची अहोरात्र सेवा केली
- कोरोना काळात विरोधक कुठे होते. त्यांना सभासदांच्या आरोग्याची काळजी वाटली नाही का ?