घरमहाराष्ट्रनाशिकपटोलेंचे वक्तव्य म्हणजे पक्षाच्या खालावलेल्या वैचारिक पातळीचं लक्षण

पटोलेंचे वक्तव्य म्हणजे पक्षाच्या खालावलेल्या वैचारिक पातळीचं लक्षण

Subscribe

माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा टोला

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य म्हणजे पक्षाच्या खालावलेल्या वैचारिक पातळीचे द्योतक आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानाचा ताफा जाणीवपूर्वक अडकवून ठेवत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपल्या संकुचित मनोवृतीचे दर्शन घडवले. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्य पाहिली तर या पक्षाची वाटचाल किती दिशाहीन झाली आहे हे समजते, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची घोडदौड वेगाने सुरू आहे. कोविड संकटानंतरही देशाच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यात पंतप्रधानांना मिळालेले यश महत्त्वपूर्ण आहे. सामान्य माणसाला योजनांचा थेट लाभ मिळत असल्याने कुठेही टीका करायला संधी नाही.

- Advertisement -

मोदी यांचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्याचे सहन होत नसलेल्या काँग्रेस नेत्यांना आपले अस्तित्व दाखविण्यासाठी मोदीजींच्या विरोधात बोलण्याची धडपड देशात सुरू केली आहे. परंतु जनाधारच कुठे मिळत नसल्याने असे वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्यापलीकडे कोणतेही काम आता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना राहिले नसल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.

राज्यातही आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला निर्णय प्रक्रियेत कुठेही स्थान दिले जात नाही. त्यामुळेच नैराश्येच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान त्यांना राहिलेले नाही, अशा शब्दांत विखे यांनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.
मोदींबद्दल केले गेलेले वक्तव्य अतिशय गंभीर असल्याने याची गृहविभागाने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -