गेल्या काही वर्षांपासून पाणी गळतीचे प्रमाण ४५ टक्यांवर गेलेले असताना ती रोखण्यासाठी तातडीची कोणतीही उपाययोजना न करणार्या प्रशासनाने शहरातील ‘पाणीबाणी’ विषयीच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी महासभेत करताच गळती रोखण्यासाठी उपाययोजना शोधण्याचे आदेश दिले. गावठाण भागात पुरेशा भागाने पाणी कसे येईल यावर उपाययोजना करण्याचे सोडून विहिरींची साफसफाई करण्याचे आदेशही महापौरांनी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. महासभेत चार तास चाललेल्या चर्चेनंतरही कुठलेही ठोस आदेश न दिल्याने लोकप्रतिनिधींना मनस्ताप सहन करावा लागला.
महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १९) महासभा झाली. यात धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणी पुरवठ्याचे दैनंदिन नियोजन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आला होता. शहरात एक वेळ पाणीपुरवठा काही भागांना संयुक्तिक असला तरीही गावठाण भागात मात्र एक वेळचे पाणीही पुरेशा दाबाने येत नाही. त्यामुळे किमान या भागापुरता तरी दोनवेळचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेस गटनेते शाहू खैरे, नगरसेवक दिनकर आढाव, संभाजी मोरुस्कर, वत्सला खैरे, सुदाम डेमसे आदींनी केली. मात्र, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रदीर्घ निवेदनात प्रशासनाने केलेल्या पाणी नियोजनाची माहिती दिली. शिवाय गळतीचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे सूचित केले.
महापौरांचे आदेश
- गळती रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्या
- जेथे पाणीपुरवठा कमी होतो, तेथे अधिकार्यांनी भेटी द्याव्यात
- नैसर्गिक स्त्रोत, आड, विहिरींची साफसफाई करुन त्यातील पाण्याचा वापर करावा
आयुक्त म्हणाले
- गंगापूर धरणातील पाणीपातळीत १५ सेंटीमीटरने घट झाल्याने चिंताजनक परिस्थिती
- यापूर्वी १६ दशलक्षघनफूट पाणी उचलले जात आता हे प्रमाण ९वर आले आहे.
- पाणी गळतीचा विभागनिहाय शोध घेणार
- रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रत्यक्षात अमलबजावणी करण्यावर भर