घरमहाराष्ट्रनाशिकआता शेतकर्‍यांना अखंडित वीज

आता शेतकर्‍यांना अखंडित वीज

Subscribe

महावितरणने सात दिवसांत बदलले ७ हजार ट्रान्सफॉर्मर

नाशिक : शेतकर्‍यांना ट्रान्सफार्मर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत वीज महामंडळाच्यावतीने नादुरुस्त रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बदलण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम राबवत केवळ ७ दिवसात ७८६७ नादुरुस्त वितरण रोहित्रे बदलली आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने स्वतः सर्व संबंधित अधिकार्‍यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी पाठपुरावा करून कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या टीमवर्कच्या आधारे राज्यातील ७८६७ नादुरुस्त रोहित्रे बदलण्याचे काम पूर्ण केले. एका विशेष कृती आराखड्याच्या अंतर्गत नादुरुस्त वितरण रोहित्रे बदलण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी महावितरण मुख्य कार्यालयातर्फे क्षेत्रीय कार्यालयांना मुबलक प्रमाणात ऑइल उपलब्ध करून देण्यात आले.

- Advertisement -

रोहित्र दुरुस्त करणार्‍या एजन्सींनाही तातडीने रोहित्रे दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. २९ नोव्हेंबर रोजी राज्यात नादुरुस्त असलेल्या एकूण ६०९८ वितरण रोहित्रांपैकी ७ डिसेंबर पर्यंत ५९१७ वितरण रोहित्रे बदलण्यात आली आहेत. याशिवाय २९ नोव्हेंबर नंतर नादुरुस्त झालेल्या रोहित्रांपैकी १९५० रोहित्रेही महावितरणतर्फे बदलण्यात आलेली आहेत. इतक्या कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त रोहित्रे बदलण्याची ही पहिलीच वेळ असून रोहीत्र नादुरुस्त होताच ते लवकरात लवकर बदलण्यासाठी महावितरण विशेष नियोजन करत आहे. नादुरुस्त वितरण रोहीत्रे बदलण्यासाठी रोहित्रांची मुबलक उपलब्धता असावी यासाठी नादुरुस्त असलेले रोहित्रे त्वरीत दुरुस्त करण्याच्या सूचनादेखील विजय सिंघल यांनी दिल्या आहेत.

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -