नाशिक : लोकवस्तूपासून दूर सुरु असलेली जलसंपदा विभागाची कामे सुरु ठेवण्याचे आदेश राज्याच्या जलसंपदा विभागाने दिले आहेत. सामाजिक अंतर राखत ही कामे पूर्णत्वास नेण्याच्या सूचना जलसंपदा विभागाचे उपसचिव ज्ञानेश्वर बागडे यांनी दिल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व पाणी पुरवठा सोडून सर्वच विभागांची कामे ठप्प झाली आहेत. यात जलसंपदा विभागाच्या सिंचन विकास महामंडळामार्फत केली जाणारी कामेही आहे त्या स्थितीत बंद पडली आहेत. पाणीसाठा व सिंचनक्षमतेच्या दृष्टिने ही कामे अत्यंत महत्वाची असून, शहर व गावांपासून दूर असल्यामुळे त्याचा धोका संभवत नाही. या ठिकाणी मजूरांचे कॅम्पस असून त्यांच्या आसपासच्या लोकवस्तीशी थेट संपर्क येथ नाही. त्यामुळे असेही ते होम कॉरंटाईन झाल्यासारखेच राहतात. त्यांचे काम बंद केल्यास ते गावाकडे स्थलांतरीत होण्याची धोका संभवतो. राज्यात अशा स्वरुपाचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे लोकवस्तीपासून दूर असलेली कामे सुरु ठेवण्यास हरकत नसल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.
&
कामे सुरु ठेवण्याच्या अटी व शर्ती
-सद्यस्थितीत कार्यक्षेत्रावर असलेल्या मजुरांमार्फत ही कामे करावी
-कॅम्पमध्ये बाहेरुन कोणतेही नवीन मजूर आणू नये
-कुटुंबियांना कॅम्प सोडून जाण्यास प्रतिबंध करावा
-कॅम्पमध्येच मजूरांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करावा
-धान्य, भाजीपाला, किराणामाल पुरवण्याची जबाबदारी ठेकेदाराची राहिल
-सामाजिक अंतर ठेवूनच काम करावे
-कोणत्याही व्यक्तीस करोनासदृश्य लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागास कळवावे
-स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे
-वरील आदेशाचे पालन होत असल्याची खात्री कार्यकारी अभियंत्यांनी करावी