नाशिक : मनसेच्या वतीने नाशिकरोड विभागीय अधिकारी यांना डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औषध धूर फवारणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले. नाशिकरोड येथील रहिवासी परिसर, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज, हॉटेल व बांधकामाचे ठिकाणी तपासणी करून दोषी आढळ्यास महानगपालिकेने नोटीस बाजावून कठोर कारवाई अन्यथा मनसे महानगरपालिकेला कायदेशीर नोटिस पाठवेल असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे कि, डेंग्यूचा प्रादुर्भाव शहरात वाढत आहे. डेंग्यूच्या उद्रेकाला आता सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय, निमशासकीय कार्यालयांसोबत बांधकाम व्यावसायिकही कारणीभूत असल्याचे चित्र आहे. नाशिकरोड विभागामध्ये शासकीय कार्यालय , निमशासकीय कार्यालय, बांधकामाचे ठिकाणे, नागरी वस्तीत डेंग्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेता या कार्यलयांची व घरांची तपासणी होणे गरजेची आहे. तसेच तपासणी करून धूर व औषध फवारणी करणे गरजेची आहे. तपासणी करताना दोषी आढळ्यास संबंधितांना दंडात्मक कारवाई करून नोटीस बजावणे गरजेची आहे.
दोन दिवसांपूर्वी दत्त मंदिर नाशिकरोड येथे एका ७ महिन्याच्या बाळाला डेंग्यू ची लागण होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या वरून लक्षात येते कि डेंगू बाबतीत प्रशासन किती ढिम्म आहे. शहरात यंदा पावसाचे प्रमाण कमी असतानाही डेंग्यूबाधित रुग्णांचा एकूण आकडा २६१ वर पोहोचल्याने नाशिक डेंग्यूचे हॉटस्पॉट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जुलै पर्यंत शहरात अवघे १४४ डेंग्यूचे रुग्ण होते. ऑगस्ट पासून पाऊस गायब झाल्याने डेंग्यूचे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. मात्र, ऑगस्टमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव अधिकच वाढत जाऊन एकट्या ऑगस्टमध्ये ११७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ९९ रुग्ण होते. यंदा मात्र पावसाळा कमी असतानाही ही रुग्णसंख्या ११७ पर्यंत पोहोचली आहे. हा सरकारी आकडा असला तरी खासगी रुग्णालयांमध्येही डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत.
डेंग्यूच्या प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यलयांची व घरांची महानगरपालिकेची तपासणी हि फक्त कागदोपत्री आहे. विभागात कुठेही धूर फवारणी होताना दिसत नाही. दिवसाला ७,००० घरांची तपासणी करण्याचा दावा नाशिक महानगर पालिका करत आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर फवारणी होत असेल तर मग डेंग्यूचा प्रादुभाव का वाढतोय? असा प्रश्नही मनसेने उपस्थित केला आहे.
नाशिकरोड विभागात मोठ्या संख्येने नवीन बांधकाम सुरु आहे. या बांधकाम साईटवर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. त्याठिकाणी पाणी टाक्यांमध्ये उघड्यावर साठा करून ठेवलेले असते. या सर्व बाबी डेंग्यूचा दास उत्पत्ति होण्यास पूरक आहेत. त्यामुळे तात्काळ अशा डास उत्पत्तीच्या ठिकाणांची तपासणी होणे गरजेचे आहे अशी मागणी मनसेचे शहर संघटक अॅड. नितीन पंडित यांनी केली आहे. दरम्यान यावेळी विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल, बाजीराव मते, शशी चौधरी, नितीन धानापुने, आदित्य कुलकर्णी, रोहन देशपांडे, अॅड. योगेश शिरसाट, सोमनाथ बोराडे, गोकुळ नागरे, संदीप आहेर, सोनू नागरे, भानुमती अहिरे, मीरा वारे, दीपक बोराडे, यशवंत नरोटे, सविता सोनवणे, प्रियंका पटेल, अशोक ठाकरे आदी उपस्थित होते.