नाशिक : शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांच्या सहकार्याने आणि सहभागाने नंदिनी नदीचे पाणी पुन्हा स्वच्छ, सर्वाना पिण्या योग्य झाले पाहिजे. त्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.
जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह हे नुकतेच नाशिक दौर्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आगरटाकळी येथील श्री मारुती देवस्थान, राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठाल भेट दिली. त्यानंतर त्यांनी नंदिनी नदीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. गोमय मारुती देवस्थानतर्फे राजेंद्रसिंह, राजेश पंडित, लक्ष्मण सावजी, नगरसेवक अनिल ताजनपुरे यांचे स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी जलतज्ज्ञ राजेश पंडित यांनी नंदिनी नदीबाबतची माहिती दिली. तर भाजपा प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी उपस्थितांना टाकळी स्थानमहात्म्याबद्दल माहिती दिली.
तसेच, सर्वच नद्या आणि नंदिनीची स्वच्छता आवश्यक असल्याचे सांगितले. गोदाप्रेमी देवांग जानी यांनीही नंदिनीच्या स्वच्छतेसाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले, समर्थ रामदास स्वामी जेव्हा प्रथम आगर टाकळी येथे आले, त्यावेळी नंदिनी नदीचे पाणी नक्कीच स्वच्छ व पिण्यालायक असेल. मात्र, आज नंदिनीचे पाणी अस्वच्छ, फेसयुक्त, प्रदूषित झालेले दिसत आहे. नंदिनीचा गोदावरी नदीशीही संगम आहे. प्रत्येकच नदीचे पाणी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त झाले पाहिजे.
नद्यांमध्ये सोडली व टाकली जाणारी घाण केमिकल्सला प्रतिबंध झाला पाहिजे. यावेळी गोमय मारुती देवस्थानचे विश्वस्त सुधीर शिरवाडकर, अॅड. भानुदास शौचे, अर्चना रवींद्र रोजेकर, तसेच समर्थ भक्त बांधकाम व्यावसायिक रवींद्र रोजेकर, अमोल शौचे, गंधाली रोजेकर, व्यवस्थापक दत्तात्रय जुन्नरे, पुजारी रमेश कुलकर्णी आदी
उपस्थित होते.