घरमहाराष्ट्रनाशिकअवैध गॅसभरणा केंद्रांना पुरवठा विभागाचे अभय?

अवैध गॅसभरणा केंद्रांना पुरवठा विभागाचे अभय?

Subscribe

पंचवटी : घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्याचा उद्योग शहरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गॅस भरताना आजवर स्फोटाच्या घटना घडल्यानंतरदेखील अवैध गॅसभरणा केंद्र सुरूच आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भात एका तक्रारदाराने पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार देऊनही संबंधित विभागाचा झापडबंद कारभार थांबलेला नाही. त्यामुळे या सर्व धंद्यांवर पुरवठा विभागाचाच वरदहस्त असल्याची शंका उपस्थित केली जाते आहे.

पंचवटीत मोठ्या प्रमाणात घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये भरुन देणारे केंद्र सुरू आहेत. टिल्लू मोटरच्या सहाय्याने अत्यंत असुरक्षितपणे गॅस भरण्याचा उद्योग सुरू असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला जातो आहे. त्यातील अनेक केंद्रांना राजकीय आणि सरकारी विभागांचे अभय असल्याने ही केंद्र अत्यंत बिनदिक्कतपणे सुरू आहेत. त्यामुळे त्याविरोधात तक्रार करण्यासाठी कुणी धजावत नाही.

- Advertisement -

केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी ग्राहकाला नोंदणीकृत मोबाईलवरून गॅस सिलेंडर नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. परंतु, या व्यवस्थेला भेदून अवैध धंदेवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर आपले जाळे पसरवत दररोज शेकडो घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू ठेवला आहे. त्यात यात गॅस वितरक, वितरण कर्मचार्‍यांचाही सहभाग आहे. ज्या ग्राहकांना दोन-तीन महिन्यांतून एकदा सिलिंडर लागते, अशा ग्राहकांना हेरुन दर महिन्याला सिलिंडरची बुकिंग केली जाते. कधी सिलिंडर वितरित करणार्‍या वाहनांतील कर्मचारीच भरलेल्या प्रत्येक सिलिंडरमधून थोडा-थोडा गॅस काढून घेतात. अशा अनेक कर्मचार्‍यांना आजवर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. मात्र, गॅस एजन्सीजकडून आजवर एकदाही त्यांच्यावर थेट कारवाई झालेली नाही.

शहरातील बहुतांश अवैध गॅस भरणा केंद्र ही दाट लोकवस्तीच्या भागांत सुरू आहेत. पत्र्याच्या शेडमध्ये हे उद्योग सुरू असतात. त्यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी पुरवठा विभाग किंवा पोलीस यापैकी कोण घेणार असा संतप्त सवाल, स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. आजही शहरातील अनेक हॉटेल्स, हातगाडी व्यावसायिकांकडून घरगुती सिलिंडरचाच मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. त्याकडेही पुरवठा विभागाची डोळेझाक सुरू आहे.

- Advertisement -

बायोडिझेल पंप दिसतात मग हे का नाही?

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील विविध ठिकाणी अचानक धाडसत्र राबवित बायोडिझेल नावाने पंप चालविणार्‍यांवरही कारवाई झाली होती. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवानग्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे यंत्रणांनी गुन्हा दाखल करत ते पंप कायमस्वरूपी बंद केले होते. त्यामुळे गॅस केंद्रांवरही अशाप्रकारची कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वरिष्ठांच्या आदेशांना तिलांजली

जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी ६ डिसेंबर २०२१ रोजी सर्व तहसीलदार व धान्य वितरण अधिकार्‍यांना अवैध गॅस सिलेंडर भरणा करणार्‍यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. त्यात त्यांनी तेल कंपनीचे अधिकारी, पोलीस अधिकार्‍यांना सोबत घेऊन जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार नियमित कारवाईची सूूचनादेखील केली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांचे हे आदेश कागदावरच राहिले. धडक कारवाई झाली असती तर अवैध केंद्र कधीचेच बंद झाले असते आणि सरकारची फसवणुकही थांबली असती.

येथे आहेत अवैध केंद्र

पंचवटीत अमृतधाम, निलगिरी बाग, अश्वमेध नगर, मखमलाबाद, पवार लॉन्स, पेठरोड येथे मोठ्या प्रमाणात अवैध गॅस भरण्याचे काम केले जाते. या व्यतिरिक्त काही ठिकाणे आहेत जिथे किरकोळ स्वरूपात हा व्यवसाय केला जातो. विशेष म्हणजे काही बड्या मंडळीने तर स्वतः गॅस भरण्याची यंत्रणा विकत घेतलेली आहे. अधिकार्‍यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे सरकारच्या डोळ्यांत सर्रास धूळफेक सुरू आहे.

अधिकार्‍यांमुळे धोका

पोलीस किंवा पुरवठा विभाग यांच्याकडून तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र अधिकारी कार्यालयातून तक्रारदारांची नावे उघड केली जात असल्याने अवैध धंदेवाल्यांकडून तक्रारदाराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तक्रार दाखल करायला कुणी पुढे येत नाही.

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -