ज्यांच्या शिरावर शहरवासियांची सुरक्षिततेची प्रमुख जबाबदारी आहे, तो पोलिस विभागच आता चोरटे आणि भामट्यांशी हातमिळवणी करू लागल्याने नागरिकांना कुणीही वाली राहिला नसल्याची भावना व्यक्त होत आहे. पंचवटी परिसरात रात्रीच्या सुमारास एका महिलेचे रिक्षात अपहरण करण्यात आल्यानंतर पोलिसांनी संबंधिताना हटकले. मात्र, या भामट्यांनी पोलिसांना चिरीमीरी देऊन महिलेला पळवून नेले आणि तिच्यावर रात्रभर अमानुषपणे बलात्कार केल्याची संतापजनक घटना नाशिकमध्ये घडली. त्यामुळे पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे.
शहरात वाढलेल्या खून आणि बलात्काराच्या घटनांमुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रहिवास करीत असल्याचा भास नाशिककरांना आता होत आहे. बेसिक पोलिसिंगचे धडे देणार्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या काळातच अशा घटना घडत आहेत हे विशेष. बळी महाराज मंदिर चौकात तोतया पोलिसांनी दुचाकी चालकाला अडवत त्याला मारहाण करून पैसे लुटले व दुचाकीही लंपास केल्याची घटना अलिकडेच घडली. महत्त्वाचे म्हणजे संबंधित व्यक्तीने आडगाव पोलीस ठाण्यात २९ वेळा फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेरचा कॉल उचलला तेव्हा ही घटना आपल्या हद्दीत नाही असे सांगत सरकारवाडा पोलिसांनी हात वर केले. ही घटना ताजी असतानाच पंचवटीत विवाहीत महिलेवर बलात्कार करण्याची घटना घडली. यात बीट मार्शल पोलिसांनी चोरट्यांकडे केलेले दुर्लक्ष आणि कथीत हातमिळवणी सर्वसामान्यांना चीड आणणारी आहे, मध्यरात्रीच्या सुमारास एका रिक्षातून प्रवास करताना बीट मार्शलने त्या महिलेची विचारपूस का केली नाही, रिक्षाचालकाला का हटकले नाही, त्याचवेळी बिटमार्शलने रिक्षाचालकाची झडती घेतली असती महिलेवर अत्याचार झाला नसता, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे येऊ लागले आहेत. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे बलात्काराची गंभीर घटना घडली असून, पोलीस आयुक्त नांगरे-पाटील हे दोषींवर कारवाई करतील का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.
महिला खरोखर सुरक्षित होणार का?
गुन्हेगार हा आपला वैयक्तीक शत्रू असल्याचे नाशिक पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगत शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत विषेश काळजी घेतली जाईल असेही स्पष्ट केले होते. या गोष्टीला महिनादेखील उलटत नाही तोच शहरात सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिस आयुक्तांनासमोर आव्हान उभे राहिले आहे. विश्वास नांगरे-पाटील यांनी शहरात ऑल आऊट मिशन, कोम्बिंग ऑपरेशन घेतले. यावेळी हिटलिस्टवरील गुन्हेगारांच्या घराची झडती घेतली. वाहन तपासणी करत गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला. आयुक्तालय हद्दीतील पोलिस स्टेशनला भेट देत आवश्यक ते बदल व गुन्हेगारी रोखण्याबाबत उपाययोजना सुचविल्या. मात्र, पोलिस आयुक्तांचे आदेश पोलिस कर्मचार्यांना मान्य नाहीत की पोलिसांना पूर्वी लागलेल्या सवयीनुसारच काम करण्यात स्वारस्य दाखवत आहेत, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
शहानिशा केली जाणार
पंचवटीतील विवाहित महिलेला बळजबरीने दोनजणांनी रिक्षा बळजबरीने बसवून नेवून अत्याचार केला. दरम्यान, संशयित रिक्षाचालक रात्रगस्त पथकाच्या पोलिसांना भेटले. त्यावेळी संशयिताने संबंधित महिला पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितले. संशयित आणि पोलिसांमध्ये काय बोलणे आहे, याची शहानिशा केली जाणार आहे. – विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त, नाशिक
बलात्कारप्रकरणी दोघांना कोठडी
नाशिक २२ वर्षीय विवाहितेवर दोन नाराधमांनी रविवारी (ता.३१) रात्रीच्या सुमारास बळजबरीने रिक्षातून बसवून नेत शरदचंद्र बाजार समिती व त्यानंतर मखमलाबाद शिवारात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी नेत बलात्कार केल्याप्रकरणी पीडितेने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पंचवटी पोलिसांनी दोघा आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेत अटक केली. दोघांना मंगळवारी (ता. २) संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बाळा उर्फ कल्याण नारायण तायडे (वय २२, रा. हनुमाननगर, पंचवटी, नाशिक) व दिगंबर उर्फ काळ्या विठोबा कुंदे (वय १९, रा. अश्वमेधनगर, पंचवटी, नाशिक) अशी नराधमांची नावे आहेत.
पेठरोडवरील कर्णनगर परिसरात राहणार्या एका २२ वर्षीय विवाहितेला दोघा संशयित नराधमांनी रविवारी (ता. ३१) रात्री १० वाजेच्या सुमारास बळजबरीने रिक्षातून बसवून नेले. दोघांनी पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीतील एका गाळ्याच्या गच्चीवर नेले. याठिकाणी संशयित नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला रिक्षात बसवून इरिगेशन कॉलनीच्या मागील बाजूस नेऊन पुन्हा बलात्कार केला. सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास पीडितेला नराधमांनी घराच्या परिसरात सोडून पलायन केले. याप्रकरणी पीडीतेने पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिने सांगितलेल्या वर्णनावरून पंचवटी पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. मुख्य आरोपी बाळा तायडे याला ओझरजवळील दीक्षी येथे नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. तर दिगंबर कुंदे याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान, या गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा (एमएच १५, एफयू ३२३४) पोलिसांनी ताब्यात घेतली. दोघा नराधमांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास महिला उपनिरीक्षक ए. व्ही. मोरे करीत आहेत.