मनीष कटारिया । नाशिक
नाशिक : गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात अचानकपणे १५४ उंट दाखल झालेत. कोसो दूर असलेल्या राजस्थानमधून हे उंट नाशिकला का आणण्यात आलेत? १३ उंटांचा मृत्यू का झाला? त्यांना राजस्थानला पायी चालवत न्यावे असा शासकीय व्यवस्थेकडून का आग्रह धरला जातोय? या प्रश्नांची उत्तरे शोधणारा ‘माय महानगर’चा हा स्पेशल रिपोर्ट
उंटांचे आर्युमान सुमारे १८ ते १९ वर्ष असते । उंची सुमारे १५ फुटांपर्यंत असते । वजन साधारण ४०० ते ६०० किलो असते । उन्हाळयात केवळ पाच दिवस पाण्यावाचून राहू शकतात । तहानलेला उंट एका वेळी १३५ लिटर पाणी पितो । वेग ताशी ४० किलोमीटर इतका असतो । शरीराचे तापमान दिवसा ४१ अंश सेल्सिअस आणि रात्री ३४ अंश सेल्सिअस असते । उंट उणे २९ अंश सेल्अिस ते ४९ अंश सेल्सिअस तापमानात जगू शकतात । २०१४ ला उंटांची संख्या जवळपास सोडतीन लाख होती । २०२१ ः२०२२ च्या गणनेनुसार हीच संख्या २ लाख १३ हजार आहे । वाराणसी, हैदराबाद येथे उंटांची तस्करी होते । उंटांना बाहेर नेण्यास बंदी असतांनाही नंदुरबार, धुळे पोलीस यांनी कुणीच कारवाई न केल्याने उंट नाशिकला पोहचले.
काय आहे नियम
- २०१५ च्या अध्यादेशानूसार राजस्थान बाहेर उंट ने आण करणे विक्री करण्यास बंदी
- उंट विशिष्ट कारणासाठी बाहेर न्यायचे असल्यास स्थानिक प्रशासनाची परवानगी बंधनकारक
- नाशिकमध्ये दाखल उंट मालकाकडे परवानगी पत्र नाही.
- उंटांना नाशकात घेऊन येणारे मालक फरार
- उंट कोणत्या कारणास्तव नाशिकमध्ये आणले गेले हा प्रश्न अनुत्तरीतच
- प्राणीमित्र संघटनेच्या जागरूकतेमुळे उंटांचे संरक्षण
- उंटांची तस्करी होत असल्याचा संशय
उंटांना पायी चालवणे का गरजेचे?
पायी मार्गाने या उंटांना पुन्हा राजस्थानमध्ये त्यांच्या मूळ अधिवासाच्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. हे उंट शेकडो किलोमीटर दूर पायी आल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे या उंटांना पुन्हा पायी मार्गाने नेण्यास प्राणीप्रेमींनी विरोध दर्शवला आहे. परंतु उंटाच्या जीवनमानानूसार उंट जितका पायी चालतो तितकी त्याची प्रकृती तंदुरूस्त राहते. नाशिकमध्ये दाखल झालेले उंट हे शेकडो किलोमीटर पायी चालत आले असले तरी त्यांची पुरेशी काळजी न घेतली गेल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. परंतु आता खास रायकांमार्फत त्यांना पुन्हा परत पाठवले जाणार असल्याने हे रायका उंटांचे योग्य प्रकारे संगोपन करतात, काळजी घेतात त्यामुळे परतीच्या प्रवासाचे टप्पे ठरवून त्यांना टप्प्याटप्प्याने पायी मार्गाने नेण्यात येणार आहे. शिवाय उंटांच्या उंचीमुळे त्यांना वाहनात नेणे शक्य नाही, वाहनात नेले तर मृत्यूचे प्रमाण अधिक वाढेल असेही सांगितले जाते.
अशी घेतली जातेय काळजी
- उंटांच्या उपचारासाठी सहा पशु वैद्यकिय अधिकार्यांची नियुक्ती
- ३५० रूपये एका उंटांच्या खाद्यासाठी खर्च
- ३० ते ४० हजार दैनंदिन खाण्या-पिण्यासाठी खर्च
- ऊस, गुळ, शेंगदाणे, चारा, ज्वारीचा कडबा, हरबरा दिला जात आहे.
- सर्व उंटांना शक्तीवर्धक इंजेक्शन देण्यात येत आहेत
- सुमारे २०० ते ३०० रूपये प्रति इंजेक्शन किंमत
- उंटांच्या रक्त व अन्य चाचण्या शासकीय प्रयोगशाळेमार्फत करण्यात आल्या.
उंटांच्या मृत्यूमागचे असे आहेत निष्कर्ष
- शेकडो किलोमीटर पायी चालतांना अन्न पाण्याविना केलेला छळ
- नैसर्गिक अधिवासात चारा, काटेरी झाडे, झाडांचा पाला खाण्याची सवय
- नाशिकमध्ये हवामानात सातत्याने होणारा बदल.
- उंट जितका चालतो तितका तो तंदुरस्त राहतो, येथे चालायला मर्यादा
- बंदिस्त ठिकाणी अन्नपाणी खात नाहीत.
- पांजरापोळमध्ये गर्द झाडीमुळे रात्रीच्या सुमारास थंड वारे वाहत असल्याने वातावरण मानवत नाही.
मृत्यू रोखण्यासाठी या केल्या जाताहेत उपाययोजना
तंदुरूस्तीसाठी शक्तीवर्धक औषधे पाजली जात आहेत. डी-वार्मिंग सारखी जंतनाशक औषधे इंजेक्शमधून व लिक्विड स्वरूपात देण्यात येत आहेत. दिवसभरात भरपूर खुराक दिला जात आहे.
नाशिक ते सिरोही असे आहेत प्रवासाचे टप्पे
नाशिक (पांजरोपोळ)- वणी-उंबरपाडा-बोरगाव-सापुतारा-गुजरात-धरमपूर
किंवा वणी-उंबरपाडा-चिराई-सुरगाणा-उंबरठाण-मनाई-चोंडी (गुजरात) धरमपूर असे असणार आहे. या मार्गांमध्ये व वेळेमध्ये काही प्रमाणात बदलही होवू शकतो.
असे करणार उंटांचे संगोपन
- नाशिकमधील १४६ उंटांना त्यांच्या मूळ अधिवासात पोहचवणार राजस्थानच्या सिरोही मधील महावीर कॅमल सेंचुरी येथे होणार
- त्यांचे पुनर्वसन उंटांना घेऊन जाण्याची जबाबदारी श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेने घेतली
- उंटांच्या वाहतूकीसाठी येणार १० लाख रूपयांचा खर्च सुमारे १ हजार किलोमीटरचा प्रवास करून उंटांना सिरोहीमध्ये नेणार
- १४ रायका (उंटपालक) मार्फत उंट राजस्थानकडे होणार रवाना दररोज ३५ ते ४० किलोमीटरचे अंतर पायी कापणार नाशिक ते सिरोही दरम्यान १५ टप्प्यांचा प्रवास
- प्रवासासाठी लागणार दीड महिना उंटांना पायीच घेऊन जावे लागणार.
- उंटांना घेऊन जायच्या मार्गावर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान पोलीसांचे एस्कॉर्ट देणार
- उंटांच्या प्रवासात महाराष्ट्र हददीपर्यंत पशुवैद्यकीय अधिकार्यांचे पथक सोबत असणार