घरक्राइमसराफ विजय बिरारी यांच्या मृत्यूबाबत पर्दाफाश

सराफ विजय बिरारी यांच्या मृत्यूबाबत पर्दाफाश

Subscribe

तेलंगणाच्या तीन पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

 

नाशिक : चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशयावरून तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून पडून मृत्यूमुखी पडलेले विजय बिरारी यांच्या मृत्यूपूर्वी नेमके काय झाले, याचा शोध राज्य अन्वेषण विभागाकडून सुरू होता. अखेर या तपासात तेलंगणाच्या तीन पोलीस अधिकार्‍यांना दोषी ठरविण्यात आले आहे. याप्रकरणी तीन पोलीस अधिकार्‍यांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तेलंगणा राज्यातील शमशाबाद पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रुपानी रामुलू व्यंकटेश, शादनगरचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सादाम कृष्णा व सीसीएस विभागचे पोलीस उपनिरीक्षक एम. डी. खाजाखान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २५ फेब्रुवारी २०२० रोजी सराफ व्यावसायिक विजय बिरारी हे तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात होते. त्यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह, नाशिक येथील चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई नाका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिकने तपास सुरू केला. पोलीस तपासात सायबराबाद पोलिसांना आरोपी संतोषकुमार शिंदे याने चोरीचे दागिने बिरारींना विकल्याची कबुली दिल्याने तेलंगणा पोलिसांचे पथक नाशिकला आले.

तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. व्यंकटेश, पोलीस निरीक्षक एन. चंद्राबाबू, पोलीस उपनिरीक्षक एस. कृष्णा, आर. नारायण, एम. डी. खाजाखान, व्ही. श्रीनिवासराव, पी. कृष्णमाचारी, एस. प्रवीणकुमार, टी. प्रवीण, एल. नारायणा रेड्डी, जे. बाब्या, के. शंकररय्या, चालक मोहम्मद झाकीर, एस. रवींद्रनाथ मिडजील हे सर्वजण तीन वाहनांनी २४ फेब्रुवारी २०२० मध्ये नाशिकमध्ये आले. सर्वजण शासकीय विश्रामगृह येथे थांबले. त्यानंतर सर्व पोलीस पंचवटीतील विजय बिरारींच्या दुकानात कायदेशीर नोटीस किंवा न्यायालयाचे कोणतेही जप्तीचे आदेश नसताना आले.

- Advertisement -

बिरारींसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर न करता अटकेबाबत मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही. त्यांच्याकडे अटक वॉरंट नव्हते. चोरीचे दागिने न दिल्यास हैद्राबादला घेऊन जावू, असे सांगत पोलिसांनी बिरारींवर दबाव टाकला. त्यातून बिरारी ताणतणावाखाली आले. त्यानंतर त्यांनी विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. ही बाब सुनीता बिरारी, अ‍ॅड. समीरखान इनामदार, चंदनकुमार चंडीचरणकुमार यांच्या जबाब व तपासातून निष्पन्न झाली.

सीआयडीच्या तपासात उघडकीस आलेल्या बाबी

विजय बिरारींना ताब्यात घेतल्याचे २४ तास झाले असतानाही तेलंगणा पोलिसांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली नाही. बिरारींना घेऊन जाताना भगवती ज्वेलर्स, पंचवटी पोलीस ठाणे, सुमन हॉटेल, नाशिकरोड पोलीस ठाणे व विश्रामगृहातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यात बिरारी व पोलीस दिसून आले. शमशाबाद पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रुपानी रामुलू व्यंकटेश, शादनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सादाम कृष्णा व सीसीएस विभागचे पोलीस उपनिरीक्षक एम. डी. खाजाखान यांनी बेकायदेशीरपणे बिरारींना ताब्यात घेतले. या तीन पोलीस अधिकार्‍यांनी योग्य तो पोलीस बंदोबस्त न देणे, जिविताची खबरदारी न घेणे, बिरारींवर दबाव टाकत आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक नम्रता देसाई यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध सरकारतर्फे गुन्हा दाखल केला आहे.

असा आहे घटनाक्रम

  • २४ फेब्रुवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी बिरारींना ताब्यात घेतले २५ फेब्रुवारी शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून पडून बिरारींचा मृत्यू
  • नातेवाईकांसह समाजबंधावाचा सायबराबाद पोलिसांवर आरोप २५ फेब्रुवारी रोजी मुंबई नाका पोलिसांनी घटनेची नोंद दाखल झाली.
  • पोलिसांच्या ताब्यात असल्याने मृत्यू झाल्याने तपास सीआयडीकडे वर्ग सीआयडीने २१५ व्यक्तींचे जबाब नोंदवले १२ डीव्हीआरमधील सीसीटीव्हींची तपासणी
  • सायबराबाद  पोलिसांचे १९ मोबाइल जप्त
  • अखेर सीआयडीकडून २० जून २०२२ रोजी तेलंगणा पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -