पुणे, मुंबई येथील उद्योगांच्या तुलनेत नाशिकच्या औद्योगिक क्षेत्र अजूनही ‘लघू’ उद्योगांमध्ये मर्यादित असताना सिन्नर तालुक्यातल्या माळेगाव ‘एमआयडीसी’तील हिंदुस्तान नॅशनल ग्लास अॅण्ड इंडस्ट्रीज (एचएनजीआयएल) कंपनीच्या व्यवस्थापनानेही ‘नॉकआऊट’ करण्याची नोटीस कामगार आयुक्तांना दिलीय. अशा परिस्थितीत कंपनी बंद पडल्यास तब्बल दोन हजार कामगार बेरोजगार होण्याची भिती व्यक्त केली जातेय.
नाशिकमधील उद्योगांच्या विस्ताराला खूपच मर्यादा राहिल्या आहेत. परंतु, पुणे, मुंबई येथील ‘एमआयडीसी’साठी आवश्यक जागा उपलब्ध होत नसल्याने आता नाशिक जिल्ह्यात उद्योग स्थापन करण्यास ‘इंडस्ट्रियलिस्ट’ प्राधान्य देताना दिसून येत आहेत. त्यांच्यासाठी औद्योगिक पुरक वातावरण निर्माण करणे गरजेचे असताना दुसरीकडे आहे ते उद्योग काही अपप्रवृत्तींच्या नाठाळपणामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
माळेगाव एमआयडीसीतील ‘एचएनजीआयएल’ या कंपनीतही सध्या कर्मचारी व कंपनी व्यवस्थापन यांच्यात वादंग सुरु असल्याचं समजतं. त्याविरोधात कर्मचार्यांनी संपही पुकारलाय. परंतु, कर्मचार्यांची भूमिका अशीच राहिल्यास आम्हाला कंपनी चालवणं अशक्य आहे, असं स्पष्ट मत कंपनी व्यवस्थापनाने कामगार आयुक्तांकडे लेखी स्वरुपात मांडलंय. त्यामुळे कंपनीच बंद पडते की काय, अशी भिती कामगारांच्या मनात निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे तब्बल दोन हजार कामगार बेरोजगार होऊ शकतात.
‘एचएनजीआयएल’ कंपनीच्या प्रशासाने कर्मचार्यांच्या संपाविरोधात ‘नॉकआऊट’ नोटीस दिली आहे. प्रशासन व कामगार यांच्यात कंपनी बंद पडू नये, यासाठी पुढील आठवड्यात बैठक बोलवण्यात आली आहे. यातून योग्य तो तोडगा काढला जाईल. – विकास माळी, कामगार आयुक्त, नाशिक