विंचूर : भाजपा किसान मोर्चाने मविआ सरकारच्या विरोधात केलेले आंदोलन व शिष्टमंडळाने वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतल्याने एकरकमी एफआरपी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऊसाचा एफआरपी एकरकमी देण्याचे लेखी आश्वासन वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत, खासदार उन्मेश पाटील, खासदार सुनील मेंढे यांनी दिल्ली येथे कृषीभवनमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. ऊस उत्पादक शेतकर्यांना एक रकमी एफआरपी देण्यासंदर्भात शिष्टमंडळासोबत गोयल यांची बैठक झाली. ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करणार नाही. शुगर कंट्रोल अॅक्ट १९६६ नुसार शेतकर्यांचा ऊस कारखान्याला गेल्यावर १४ दिवसांच्या आत शेतकर्यांना पैसे द्यावे लागतील. केंद्र सरकार एफआरपीमध्ये बदल करणार नाही, असे गोयल यांनी स्पष्ट केले. या निर्णयाचे किसान मोर्चा प्रदेश चिटणीस काका दरेकर, कैलास सोनवणे, संपत नागरे, संजय शेवाळे, गंगाधर गोरे, निलेश सालकाडे आदींनी स्वागत केले.