घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमिश्रपीक पद्धतीतून फुलविले सूर्यफुले; कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी यशस्वी प्रयोग

मिश्रपीक पद्धतीतून फुलविले सूर्यफुले; कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी यशस्वी प्रयोग

Subscribe

अकोले : तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या जहागीरदार वाडी या गावातील प्रयोगशील शेतकरी बाळू घोडे व विमल घोडे या पती-पत्नीने आपल्या प्रयोगशील कृतीने नेहमीच आदर्श घडवला आहे. एकाच पिकाच्या मागे न लागता मिश्र पीक पद्धतीचा अवलंब त्यांनी केला आहे. सध्या त्यांच्या शेतात फुललेले सूर्यफूल सर्वांचे लक्ष वेधत आहे. सूर्यफुलाचे पारंपारिक वाण ते गेली चार ते पाच दशके आपल्या शेतात पेरत आले आहेत. एकल पीक पद्धतीच्या मागे न लागता त्यांनी मिश्र पीक पद्धती यशस्वी करून दाखवली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवटचे टोक म्हणून ओळखले जाणारे बारी आणि जहागीरदारवाडी ही गावे निसर्गाच्या कुशीत बसलेली सुंदर आणि टुमदार गावे आहेत . इथला शेतकरी काबाडकष्ट करून आपली शेती फुलवत असतो. जहागीरदारवाडी गावातील बाळू व विमल हे अत्यंत कष्टाळू कुटुंब आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांच्या या प्रयोगशील शेतीमध्ये याची मुले केशव आणि रूपाली हे सुद्धा तेवढयाच आवडीने सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मिश्र पीक पद्धती आपल्या शेतावर करून शेतीतील वेगळेपण त्यांनी जपले आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये हुलगा , राजगिरा व सूर्यफूल एकत्रित पद्धतीने त्यांनी पेरणी केली होती. त्यांची शेती छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विखुरलेली आहे. सिंचनाच्या कुठल्याही सोयी उपलब्ध नसल्याने पावसाच्या पाण्यावर ते शेती करतात. मेहनत आणि कष्ट यावर संपूर्ण भरोसा ठेवत याही वर्षी सुंदर पद्धतीने शेती फुलवली आहे.

- Advertisement -

पावसाळा संपल्यानंतर जमिनीतील ओलीवर होऊ शकणारे पिके आपल्या जमिनीत ते करतात. चालू हंगामात सुद्धा नियोजनबद्ध शेती करताना त्यांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे. खुरसनी , भुईमूग व सूर्यफूल यांचे एकत्रित तेल पाडून ते दैनंदिन आहारामध्ये वापरले जाते. त्यामुळे भेसळ युक्त तेलांपासून त्यांना मुक्तता मिळते. बाळू आणि विमलताई पारंपरिक वाणांच्या संवर्धनासाठी या भागामध्ये प्रसिद्ध आहेत. मुंबई येथील एएसके फाउंडेशन आणि आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त स्वयंसेवी संस्था बायफ यांचे त्यांना नियमित मार्गदर्शन लाभत आहे. बाळू आणि विमलताई यांनी पिकवलेलो शेत पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने त्यांच्या शेताला भेट देतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -