लॉकडाऊनने कसे वागावे, गृहिणीवर कुटुंबाची किती जबाबदारी असते, एकत्र राहणे किती गरजेचे असते अशा अनेक गोष्टी शिकवल्या. प्रत्येकाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव झाली. कुटुंबातील सदस्य मनाने जवळ आले. त्यामुळे या संकटकाळात मिळालेली ही शिकवण आयुष्यभर जपावी, असा कानमंत्र ‘सुपर मॉम्स’ने दिला.
दिल्ली पब्लिक स्कूलच्या वतीने मातृदिनानिमित्त ‘सुपर मॉम : अ हॅपी फॅमिली’ विषयावर पालकांसाठी वेबिनार आयोजित केले होते. त्यात गौरी चव्हाण, सोनाली दाबक, निकिता बेंबी, डॉ. नेहा रहाटे, श्रद्धा अकुला व रेणू पाणीकर या सहा सुपर मॉम्सना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात त्यांनी विद्यार्थी-पालकांशी संवाद साधला. दाबक म्हणाल्या की, आपण आता लॉकडाऊनशी समरस झालो आहोत. आपल्याला आता सोशल डिस्टन्सिंग पाळत कसे वागले पाहिजे, हे समजले आहे. मनामनांतले अंतरही या संकटकाळाने दूर केले आहे.
श्रद्धा अकुला म्हणाल्या, आनंदी आईच आपल्या मुलांना आनंदी, सुखी आयुष्य देऊ शकते. त्यासाठी नेहमी आनंदी राहून सकारात्मक विचार करणे अत्यावश्यक आहे. कोणतीही चांगली गोष्ट करायला वयाचे बंधन नसते. आपल्याला कुणाची मदत हवी असेल ती मागताना कमीपणा मानू नका. चुकांना घाबरू नका कारण कधी कधी चुकासुद्धा सुंदर असतात. पाणीकर म्हणाल्या, मुले सूक्ष्म निरीक्षक असतात. मुलांना छंद जोपासायला, लोकांशी संवाद साधायला शिकवा. त्यांच्या कृतींचे सकारात्मक रूपात कौतुक करा आणि नकारात्मकतेकडे जाण्यापासून थांबवा. बेंबी म्हणाल्या की, लॉकडाऊन नंतरची नवीन ओपनिंग निश्चितच अधिक असतील. मुलांना ‘रीयूज आणि रिसायकल’ करणे शिकवा. या काळात करोनाविरुद्ध लढणाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे. दया, करुणा, जबाबदारी अशा भरपूर गोष्टी शिकलो आहोत. आपण एकत्र येऊन आव्हानांना सामोरे जाऊ.
आजवर आलेल्या अनेक संकटांमधून आपण बाहेर पडलो. आपल्या मुलांनाही हे सांगितले पाहिजे, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. डॉ. रहाटे म्हणाल्या की, लॉकडाऊनच्या काळात स्त्रिया खूप व्यस्त झाल्या आहेत. ऑफिसचे काम घरून करत आहेत. या महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठीही वेळ दिला पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी कोणत्याही गोळ्या घेऊ नका. मोबाईलमध्ये अतीवेळ घालवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.