शैक्षणिक वर्ष सुरु होऊन चार महिने झाल्यानंतर आता शहरातील इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार येत्या सोमवारी (दि.4) शहरातील 227 शाळा सुरु होतील. यामध्ये साधारणत: एक लाख 10 हजार विद्यार्थी आहेत.
माध्यमिक शिक्षणाधिकारी पुष्पावती पाटील व महापालिकेच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी शहरातील शाळांसाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक वर्गात 50 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील. एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले जाईल. ज्या शाळामध्ये सकाळी व दुपारी अशा पध्दतीने शिफ्ट करणे शक्य असेल त्यांनी तो पर्यायही निवडण्याचे आदेश शिक्षणाधिकार्यांनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित, आनंददाय्री, आरोग्यदायी वातावरण मिळाले यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. चिडचिड करणारे, गोष्टीने निराश होणारे, नेहमी शांत बसणारे, वयाशी विसंगत वर्तणूक दर्शवणारे विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी. चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यास रजेवर राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
- मार्गदर्शक सूचना
- शिक्षकांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक
- शाळेत गणित, विज्ञान व इंग्रजी हे विषय प्राधान्याने शिकवले जातील
- शिक्षकांनी आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक
- पहिले दोन आठवडे प्रत्यक्ष विषय शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शाळेची सवय लावावी
- शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याचे आदेश
- पालकांना शाळेत प्रवेश नाही
- आजारी विद्यार्थी किंवा शिक्षकांना सुटी द्यावी
- शाळेत तापमापक, जंतूनाशक, साबण, पाणी आदी साहित्य उपलब्ध करुन द्यावे