शहरातील नेहरू चौक येथील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरु असलेल्या रस्त्याची खोली अडीच फुटापर्यंत कमी करण्यास स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकार्यांनी सहमती दर्शवली. आमदार देवयानी फरांदे यांनी या रस्त्याच्या कामाचा फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना स्मार्ट सिटी कंपनीला दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नाशिकच्या नेहरू चौक येथे रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यापेक्षा सव्वा मीटर खोल रस्ता तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत असंतोष व्यक्त केला. आमदार देवयानी फरांदे त्यांनी या भागात भेट देत कामाची पाहणी केली. यावेळेस नागरिकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रभाव कमी होऊन नागरिकांनाही त्रास होणार नाही अशा प्रकाराने नियोजन करण्याचे आदेश स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकार्यांना दिले होते. त्यानूसार या कामाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी परिसरातील नागरिकांनी याकामाबाबतचे आक्षेप मांडले. पुर आणि पावसामुळे होत असलेल्या नुकसानीच्या बाबतही नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी रस्त्याची खोली कमी करून सदर खोली अडीच फुटापर्यंत कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी डीजीएम दिग्विजय पाटील, नगरसेवक गजानन शेलार, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी, शिवा जाधव, गणेश मोरे, प्रतीक शुक्ल , नचिकेत महाजन, पवन उगले,निनाद नांदुरीकर, कमलेश पारख अवधूत पिंपळे, परेश शहा, गौरव सोनवणे,यांच्यासह परिसरातील व्यावसायिक उपस्थित होते.
काय आहे समस्या
सराफ बाजार, दहिपूल ते धुमाळ पॉईंट, फुलबाजार परिसरात पावसाचे पाणी साचून दुकानदारांचे मोठे नुकसान होते. ही समस्या सुटावी म्हणून स्मार्ट सिटीकडून दहिपूल ते धुमाळ पॉईंटचा रस्ता खोदण्यात आला. मात्र ज्या ठिकाणी चढ आहे, तेथे जमिनीचा स्तर कमी करणे अपेक्षित असतांनाही तसे झालेले नाही. सर्वच परिसर इतका खोल करण्यात आला आहे की, दुकाने, गल्ल्यांमध्ये जाणारे रस्ते वर राहतील याबाबत व्यावसायिकांनी नाराजी दर्शवली.