नाशिक : पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असून जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सीबीएसईच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना शिक्षण देणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शनिवारी काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबीरादरम्यान नाशिकच्या दौर्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी गायकवाड यांनी महापुरुषांच्या नावांवरुन करण्यात येणार्या वादावर भाष्य केले. नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाववरून वाद निर्माण केला जातो, त्यामुळे मुलांना थोर पुरुषांच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
शाळांमध्ये ग्रंथोत्सव आणि शिक्षण उत्सव सुरू करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. शालेय शिक्षण विभाग प्रत्येक घराशी सबंधित विषय आहे. शाळांमध्ये शनिवार हा पुस्तक विरहित असावा, छंद जोपासण्यासाठी वेळ देणार असल्याचेही गायकवाड यांनी यावेळी सांगितले.