मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यान बांधण्यात आलेल्या पुलाचे काम पूर्णत्वास आले असून येत्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. साडेतीन किलोमीटरच्या या पुलामुळे महामार्गावरील वाहतुकीचा जाण कमी होऊन सतत होणार्या अपघातांना आळा बसेल, असे गोडसे यांनी सांगितले.
खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या या पुलामुळे नाशिककरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. २०१८ मध्ये या पुलाचे काम सुरू करण्यात आले. अहमदाबाद येथील दिनेश अग्रवाल यांच्या कंपनीने ३८ महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण केले आहे. आडगाव नाका ते के. के. वाघ कॉलेज, औरंगाबाद नाका, अमृतधाम, बळी महाराज मंदिर, हॉटेल जत्रा, मेडिकल कॉलेज या परिसरात मोठ्या संख्येने शासकीय कॉलेज, महाविद्यालये असल्याने महामार्गावर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. याशिवाय आडगाव, जानोरी, दहावा मैल, सैय्यद पिंप्री आदी ग्रामीण भागातील शेतकरीदेखील आपला शेततमाल पंचवटी मार्केटला विक्रीसाठी याच मार्गाने आणतात. त्यामुळे अवजड वाहने तसेच शेतमालाची वाहने यांमुळे नियमित वाहनांच्या लांबच लांब रांगा याठिकाणी लागलेल्या दिसतात.
या भागात उड्डाणपूल नसल्याने व हा महामार्ग अरुंद असल्याने या महामार्गावर तासन् तास कोंडीची समस्या निर्माण होत होती. या महामार्गावर होणार्या अपघातांमुळे आजपर्यंत अनेकांना कायमस्वरुपी अपगंत्व आले असून अनेकांचे प्राणदेखील गेले आहेत. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन खासदार हेमंग गोडसे यांनी या उड्डाणपुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन
घेतला होता.
दृष्टिक्षेपात उड्डाणपूल
- साडेतीन किलोमीटरचा हा उड्डाणपूल
- पुलाच्या दोन्ही बाजूस रॅम्प उभारण्यात आले
- या रॅम्पची रुंदी १९.७७ इतकी आहे
- प्रत्येक चाळीस मीटरच्या एक स्पॅन उभारण्यात आले आहे
- उड्डाणपुलासाठी सुमारे चारशे कोटी रुपये खर्च
- महामार्गाच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड
- मुंबई-धुळ्याकडून येणार्या वाहनांना थेट गरवारेपर्यंत विनाअडथळा प्रवास करता येणार