घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र..तर मी राजकारणाबाहेर राहिलो असतो : अमित ठाकरे

..तर मी राजकारणाबाहेर राहिलो असतो : अमित ठाकरे

Subscribe

मनमाड : सध्याचे राजकारण पाहता जर मी राजकारण विरहीत क्षेत्रात असतो तर राजकारणात आलो नसतो, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी मनमाडला पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही तरूणांसमोर मनसेच्या रूपाने चांगला पर्याय दिला आहे. त्यामुळे तरुणांनी राजकारणात यावे असे आवाहन त्यांनी केले.

मनसे नेते अमित ठाकरे सध्या नाशिक जिल्ह्याचा दौरा करून महासंपर्क अभियानांतर्गत विद्यार्थी आणि तरूणांसोबत संवाद साधत आहे. रविवारी ते मनमाडला आले होते. यावेळी पत्रकारांसोबत देखील संवाद साधताना म्हणाले कि, मला राज ठाकरेंनी जबाबदारी दिल्यानंतर कोविड आला. त्यामुळे बाहेर पडता आले नव्हते, मात्र आता कोविड आटोक्यात येत असल्यामुळे बाहेर पडून कार्यकर्ते, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी महासंपर्क अभियाना सुरु केले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्याचे सुरु असलेले राजकारण पाहता तरुण पिढी राजकारणात येण्यास तयार नाही असे विचारल्यावर सध्याचे राजकारण बघून मी बाहेर असतो तर मी पण राजकारणात आलो नसतो. मात्र आम्ही एक पक्ष म्हणून तरुणांना पर्याय दिला आहे आणि मला खात्री आहे कि तरुण-तरुणी नक्कीच राजकारणात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही, याबाबत मत विचारले असता सध्या मी पक्ष वाढीवर भर देत असून जनतेचे प्रश्न आणि समस्या नाही सुटल्या तर त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी असल्याचे अमित ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

ठाकरे नाव देशात एक ब्रँड म्हणून ओळ्खले जाते. जेंव्हा जेंव्हा ठाकरे कुटुंबीयावर संकटे येतात तेंव्हा तेंव्हा ते एकमेकांना मदत करण्यासाठी येतात. आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर राजकीय संकट आले आहे. अशावेळी चुलता म्हणून आणि बंधू म्हणून तुमची काय भूमिका राहणार असे विचारल्यावर माझी काहीच भूमिका राहणार नाही. याबाबत राज ठाकरेंची जी भूमिका आहे तीच माझी राहणार, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
अमित ठाकरे यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर शहर मनसेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज आणि पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. अमित ठाकरे यांचे शहरात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. संयोजन शहराध्यक्ष सचिन सिरुड, सुनील कोल्हे, रोहित दराडे, प्रदीप आहिरे, जाकीर पठाण यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -