घरमहाराष्ट्रनाशिकथरारनाट्य: जनावरे चोरणारी ठाण्याची टोळी अटकेत

थरारनाट्य: जनावरे चोरणारी ठाण्याची टोळी अटकेत

Subscribe

शहरात जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून पळवून नेणारी टोळी सक्रिय

पंचवटीतील अमृतधाममधील मंडलिक मळा परिसरात मंगळवारी (दि.१) मध्यरात्री ३ वाजता चोरटे आणि पोलिसांमध्ये थरारनाट्य घडले. जनावरे चोरण्याच्या हेतूने आलेल्या ठाण्याच्या टोळीचा पोलिसांनी पाठलाग केल्याने चोरटे पोलीस वाहनाला धडक देऊन पळून लागले. पोलिसांनी पाठलाग करुन तिघांना अटक केली. याप्रकरणी पोलीस शिपाई अंबादास जगन्नाथ केदार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सराज युसूफ काझी (वय २४, रा. ठाणे), इरफान रमजान शेख (२३, दोघेही रा.भिवंडी, जि.ठाणे), दिलशाद समाशोद्दीन अन्सारी (३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुल्ला खान (३८, रा. मुंब्रा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस शिपाई अंबादास जगन्नाथ केदार व त्यांचे सहकारी डी. बी. मोबाईल व्हॅनने पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून कॉल आला. त्यानुसार पोलिसांनी काळ्या रंगाचे वाहन थांबवण्यासाठी मंडलिक मळ्याजवळ डी. बी. मोबाईल व्हॅन रस्त्यावर आडवी लावली. त्यानंतर पोलीस व्हॅनमधून खाली उतरले. पोलिसांनी संशयित वाहन थांबवण्याचा इशारा चालकास केला. मात्र, चालकाने स्कॉर्पिओ (एमएच ०२-एनए ७७८४) भरधाव वेगाने चालवून पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर मोबाईल व्हॅनला जोरदार धडक देवून संशयित स्कॉर्पिओने मुंबईच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करत तिघांना पकडले. त्यावेळी मुल्ला खान अंधाराचा गैरफायदा घेत पळून गेला.

अश्वमेधनगरमधून गायी पळवण्याचा प्रयत्न

शहरात जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करुन स्कॉर्पिओतून पळवून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे. वशराज अजूभाई सबाड यांच्या गीर जातीच्या गायी अश्वमेधनगर येथील मोकळ्या मैदानात चरत होत्या. त्यावेळी संशयित चौघांनी गायीला गुंगीचे इंजेक्शन देऊन कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जाण्यासाठी स्कॉर्पिओ (एमएच ०२-एएन ७७८४)मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवाने वशराज सबाड आल्याने चौघेजण गायी सोडून पळून गेले. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाणेगावात दोन गायींची चोरी

नाणेगाव येथे चोरट्यांनी रविवारी (दि.३०) रात्री गोठ्यातून ८० हजारांच्या दोन गायी पळवल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रसाद विजय मुठाळ (३२, रा. नोणगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (दि.३१) मध्यरात्री मुठाळ यांच्या गोठ्यातून चौघा चोरट्यांनी दोन गायी पिकअप (एमएच १५ जीव्ही ६३४०)मधून चोरून नेल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -