नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक होणार्या टोमॅटोचे दर गत दोन महिन्यांपासून तेजीत आहे. दरात घट होत नसल्याने आणि आवकही कमी असल्याने मिळेल तो टोमॅटो खरेदी करण्याचा व्यवहार व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या टोमॅटोचे दर अधिकच वाढलेले आहे. काल बाजार समितीत अवघी 825 क्विंटल टोमॅटो आवक झाली होती.
बाजार समितीत टोमॅटोला सर्वाधिक दर 20 किलोच्या जाळीला 1250 रूपये मिळालेला होता. जून महिन्यापासून टोमॅटो आवक कमीच असल्याने आणि स्थानिक बाजारपेठेसह पर जिल्ह्यातील व्यापार्यांकडूनही मागणी कायम असल्याने टोमॅटोचे दर आजही 20 किलोच्या जाळीला प्रतवारीनुसर सुमारे 400 ते 450 रूपये असे आहेत. हाच टोमॅटो 40 ते 60 रूपये किलो दराने नाशिकमधील भाजीबाजारात विक्री होत आहे. नाशिक जिल्ह्यातील तीन ते चार तालुक्यातूनच टोमॅटोची आवक होत आहे. त्यात सिन्नर, कळवण, दिंडोरी आणि नाशिक तालुक्याचा समावेश आहे. दरवर्षी मार्केटमध्ये ऑगस्ट महिन्यात टोमॅटो आवक वाढून टोमॅटोचे दर स्थिरावतात यंदा मात्र चित्र उलटे आहे. टोमॅटोची आवक कमी आहे. दर मात्र वाढलेले आहे. त्यामुळे मागणी कायम आहे.
15 दिवसांपूर्वी झालेल्या संततधारेने टोमॅटोचे रोपे झोडपली गेली होती. पाण्याचा अतिरेक आणि सूर्यप्रकाशाचा अभाव, यामुळे रोपांची वाढ खुटलेली होती. जे परिपक्व रोपे होती त्यावरची वरची फुले गळून पडली होती. तर ज्या रोपांना टोमॅटो लागलेली होती. त्यावर काळे डाग, खरड पडून चमक निघून गेलेली होती. त पावसाच्या फटक्याने तडे गेल्याने टोमॅटोला चिरा पडल्या आहेत. तरी जे शेतकरी टोमॅटोला विक्रीसाठी आणतात, त्यांच्या भोवती व्यापार्यांचा खरेदीसाठी गराडा पडतो. या चढाओढीत टोमॅटो उत्पादकांना सध्या चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे.
खरेदीसाठी व्यापार्यांचा मुक्काम
नाशिकच्या बाजार समितीत टोमॅटो खरेदीसाठी गुजरातच्या व्यापार्यांनी मुक्काम ठोकला आहे. कारण गुजरातमधील बाजारांमध्ये टोमॅटोची मागणी वाढलेली आहे. तेथे स्थानिक शेतकर्यांचा टोमॅटोही विक्री येत नाही. नाशिकमधूनही पुरवठा कमी झाल्याने व्यापार्यांनी आडत्यांना टाळून थेट नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो खरेदी करण्यास धाव घेतलेली आहे. नाशिकच्या टोमॅटोला मुंबई आणि मध्यप्रदेशातील बर्हाणपूरही मोठी बाजारपेठ असल्याने टोमॅटोसाठी येथील व्यापारी स्वतः वाहनाने नाशिकला आलेले आहेत.