जामखेड : तालुक्यात बुधवारी दोघा अल्पवयीनांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. दुहेरी आत्महत्येच्या या घटनेमुळे जामखेड तालुका हादरून गेला आहे.आपटी या गावात ही घटना घडली. ख़ृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. जामखेड पोलिसांत या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जामखेड तालुक्यातील आपटी येथील आशा ऊर्फ अश्विनी गोपीनाथ घुले (वय १६) या अल्पवयीन मुलीने दुपारी एक वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेच्या काही वेळानंतरच तरुण अशोक बंडू कडू (वय १७) यानेही गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले. मयत आशाच्या मृत्यूची बातमी येताच याबाबत खात्री करण्यासाठी अशोक तिच्या घरी जाऊन आला, त्यानंतर त्याने व्हॉट्सअॅपवर ‘मीदेखील जीवन संपवत आहे’ असे स्टेटस ठेवले, अशी प्राथमिक माहिती आहे.